Just another WordPress site

“राज्याच्या गृहखात्याने तावडेंवर पाळत ठेवली अन पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला” !! संजय राऊतांचा खळबळजनक आरोप !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१९ नोव्हेंबर २४ मंगळवार

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीचा प्रचारानंतर आता बुधवारी (२० नोव्हेंबर) राज्यात मतदान पार पडणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.मात्र अशातच विरारमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या.विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला.मात्र हे आरोप नंतर भाजपाकडून फेटाळून लावण्यात आले.यानंतर विनोद तावडे यांनीही हे सर्व आरोप फेटाळले.यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेराव घातल्याचेही पाहायला मिळाले मात्र यानंतर विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे.यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहेत.“विनोद तावडे बाबतची पैसे वाटपाची माहिती महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रमुख नेत्याने हितेंद्र ठाकूरांना दिली. महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून विनोद तावडेंवर पाळत ठेवली गेली आणि तावडे पकडले जातील यासाठी बंदोबस्त झाला” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी जे घडले ते कॅमेऱ्यासमोर आहे व यामधून भाजपाचा खरा चेहरा समोर आला.विनोद तावडे हे पक्षाचे महासचिव आहेत मग एका पक्षाच्या महासचिवाकडे ५ कोटी रुपये आढळून आले.पैशाचे वाटप करत असतानाच तिकडे बहुजन विकास आघाडीचे लोक गेले आणि पैसे जप्त केले.त्या ठिकाणी काही वेळ गोंधळ झाला तसेच भाजपाच्या महासचिवांना कोंडून ठेवले.या सगळ्या प्रकरणावर आता भाजपा काय खुलासा करणार ? महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान १५ ते २० कोटी रुपये आचारसंहितेच्या आधी पोहोचले आहेत असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.नाशिकला आज एका हॉटेलमध्ये शिंदे आणि अजित पवार गटाचे पैसे पकडले गेले.मुंबई आणि ठाण्यातून पैसे वाटण्यासाठी खास माणसांच्या नेमणुका झाल्या आहेत.राम रेपाळे नावाच्या एका माणसासह माझ्याकडे १८ लोकांची नावे आहेत मात्र विनोद तावडे हे स्वत: पैसे वाटतात हे आश्चर्य आहे.आमच्या बॅगा तपासतात.निवडणूक आयोगाच्या लोकांनी आमच्यामागे जो ससेमिरा लावला जर भाजपा,शिंदे आणि अजित पवारांच्या लोकांमागे ससेमिरा लावला असता तर किमान महाराष्ट्राच्या तिजोरीत १ हजार कोटी मिळाले असते असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.विनोद तावडे यांच्याबाबतची माहिती महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रमुख नेत्याने हितेंद्र ठाकूर यांना दिली.विनोद तावडे हे भविष्यात आपल्याला जड होतील कारण हा बहुजन समाजाचा चेहरा आहे.महाराष्ट्राचा एक माणूस राष्ट्रीय महासचिव आहे.त्यांच्या हातात काही सुत्रे आहेत त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने पकडून द्यावे यासाठी भाजपामध्येच कारस्थान झाले.ज्यांच्याकडे राज्याचे गृहखाते आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते.महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून विनोद तावडेंवर पाळत ठेवली गेली आणि तावडे पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.