मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत.या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे.या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली तसेच धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला.आपपासांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये अशा शब्दांत भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्राजक्ताने धस यांनी आपली जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या वादंगादरम्यान आमदार सुरेश धस यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींसह माळीचेही नाव घेत टिप्पणी केली होती.दरम्यान काल तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रारीचे निवेदन सादर केले.
मुख्यमंत्री कार्यालयामार्फत ही माहिती देण्यात आली.एक्स खात्यावरून फोटो पोस्ट करून म्हटले आहे की,“अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले.त्यांच्या सन्मानाला बाधा येईल असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले.त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले आहे.
प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेत काय म्हटले ?
“कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाणे,प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे कलाकारांचे काम आहे.परळीच नाही,महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केले आहे व यापुढेही काम करत राहणार.याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर,मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग त्या फोटोचा संदर्भ घेऊन तुम्ही कुणाहीबरोबर असेच नाव जोडणार का ? हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटते.महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही.ते बोलले ते इतके कुत्सित आहे.तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात.महिलांच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात.कुठल्या राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का ? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवत आहात” अशा शब्दांत प्राजक्ता माळीने आपला संताप पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.