“अजित पवार २० हजार मतांनी पराभूत तर महायुतीला फक्त १०७ जागा” !! आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा !!
बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० डिसेंबर २४ सोमवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर हे सातत्याने ईव्हीएमवर शंका घेत आहेत.त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मारकडवाडी या गावात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची त्यांनी तयारी सुरू केली होती मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे हे मतदान टळले.त्यानंतरही जानकर यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली.निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार असेल तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते.आता त्यांनी अजित पवार यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तसेच ईव्हीएमचा अभ्यास केला असून महायुतीला राज्यात बहुमत मिळालेले नाही असेही त्यांनी सांगितले असून यावेळी महायुतीमधील तीनही पक्षांना किती जागा मिळाल्या याचे गणितच त्यांनी मांडले आहे.
आमदार उत्तम जानकर यांनी काल बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली व या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ईव्हीएममध्ये गडबड होत असून याची प्रक्रिया राहुल गांधी,शरद पवार आणि निवडणूक आयोग यांच्या लक्षात आणून देणार असल्याचे ते म्हणाले.ईव्हीएमच्या कंट्रोल बॉक्समध्ये गडबड होत आहे.व्हीव्हीपॅट मधून जी पावती बाहेर येते ती मतदारांच्या हातात दिली जावी आणि मतदार स्वतःच्या हाताने ती बॉक्समध्ये टाकले अशी परवानगी देण्याची मागणी जानकर यांनी केली आहे.उत्तम जानकर पुढे म्हणाले,नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जवळपास १५० मतदार संघात गडबड झालेली असून याची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही २० हजार मतांनी पराभूत असल्याचे दिसून येते.अजित पवार यांना एक लाख ८० हजार मते मिळालेली आहेत.त्यापैकी दोनास एक असे सूत्र वापरले गेले आहे त्यामुळे युगेंद्र पवार यांना ८० हजार अधिक ६० अशी एक लाख ४० हजार मते मिळालेली असून अजित पवारांना केवळ १ लाख २० हजार मते उरतात असे आमदार उत्तम जानकर यांनी नमूद केले आहे.
अजित पवारांचे फक्त १२ आमदार निवडून आले !!
यापुढे जाऊन उत्तम जानकर म्हणाले की,अजित पवार गटाचे केवळ १२ आमदार निवडून आलेले आहेत तसेच एकनाथ शिंदे यांचे केवळ १८ आमदार निवडून आलेले आहेत तर भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेले आहेत परिणामी महायुतीची एकूण संख्या १०७ एवढी होते,दोन-तीन अपक्ष मिळून ते ११० पर्यंतच पोहोचतात. याबाबत मी सर्व मतदारासंघाचा बारकाईने अभ्यास केला असल्याचेही ते म्हणाले.
“अजित पवार पराभूत, तर युगेंद्र पवारांना एवढे मतदान” !! EVM छेडछाडीबाबत उत्तमराव जानकरांचा मोठा दावा !!
ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्यामुळेच महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला असून त्यांनी महायुतीला किती जागा मिळाल्या, याची आकडेवारी दिली आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून महायुतीचा विजय झाला असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे.
-
बारामतीमध्ये अजित पवार २० हजार मतांनी पराभूत झालेले असून युगेंद्र पवार याठिकाणी विजयी आहेत असा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे.अजित पवारांना १,८१,१३२ तर युगेंद्र पवारांना ८०,२३३ इतकी मते पडली होती.जानकर यांच्या दाव्यानुसार युगेंद्र पवारांची ६० हजार मते कमी झाली आहेत.
-
एवढेच नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त १२ आमदार निवडून आले असते असेही ते म्हणाले आहेत. सध्या अजित पवारांचे ४१ आमदार आहेत.
-
उत्तम जानकर यांच्या दाव्यानुसार भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेले आहेत. महायुतीचे मिळून १०७ आणि अपक्ष मिळून त्यांचा आकडा ११० झाला असता असेही जानकर म्हणाले.
-
तर शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षाचे फक्त १८ आमदार निवडून आले असते असेही ते म्हणाले.शिवसेनेचे (शिंदे) ५७ आमदार निवडून आलेले आहेत.
-
उत्तम जानकर यांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर हे दावे केले आहेत.यावर अद्याप शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही.
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनीही ईव्हीएमवर याआधी शंका उपस्थित केलेली आहे.
-
शरद पवार यांनी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी आणि जिंकलेल्या जागांची तुलना करून मध्यंतरी टीका केली होती.अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा त्यांच्या गटाला अधिक मते मिळालेली आहेत.
-
राष्ट्रवादीचे उत्तम जानकर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सुनील राऊत यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा बॅलेटवर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली असून EVM विरोधात लढण्याचा निर्णय त्यांनी बोलून दाखवला आहे.