शिवसेनेच्या सातबाऱ्यावर तोतया वारसदारांचे नाव !! भास्कर जाधव यांचे टीकास्त्र !!
चिपळूण-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सिद्ध करण्याकरता लढत राहू आणि सिद्ध करून दाखवू.पक्ष सोडण्याचा किंवा नाराज असण्याचा काही प्रश्न नाही असे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले,एका रात्रीत तलाठी मूळ वारसदाराला डावलून तोतया वारसदाराचे नाव सातबारावर दाखल करतो.आमच्या शिवसेना पक्षाचा देखील असेच झाले आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत परंतु विधानसभा अध्यक्ष,निवडणूक आयोग यांनी खऱ्या वारसदाराला बाजूला सारून शिवसेनाप्रमुखांची शिवसेना,निशाणी,झेंडा हा तोतया वारसदारांचा असल्याचे ठरवले हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार जाधव म्हणाले,गेल्या चार दिवस मी जे वक्तव्य केले नाही किंवा जी गोष्ट माझ्या मनामध्ये सुद्धा नाही त्याला प्रसारमाध्यमांमध्ये खूप मोठी प्रसिद्धी देऊन खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया माझेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे.मला माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझे दुर्दैव आहे आणि अशी संधी केवळ मलाच मिळाली नाही असे नाही तर ती अनेकांना मिळत नसते असे मी म्हणालो परंतु मला शिवसेना पक्षाने संधी दिली नाही असे मी बोलल्याचे सातत्याने हायलाईट केले जात आहे असे त्यांनी सांगितले.
मुळात माजी आमदार राजन साळवी यांनी इतर पक्षांमध्ये जाऊ नये याकरता मी सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे,सूर्याजी मालुसरे आणि उदयभान यांच्यात झालेल्या लढाईचा दाखला देऊन आपले राजकीय मरण तर पक्क आहे मग परतीचे दोर कापले असे समजून लढू,प्रसंगी मरण पत्करू आणि जिंकू असे आवाहन मी त्यांना केले पण ते अन्य पक्षात गेले तेव्हा राजन साळवी गेले म्हणून रत्नागिरी जिल्हा किंवा कोकण तिकडे गेला असे होत नाही तेव्हा मी त्यांच्याविषयी काही गोष्टी बोललो. आज कोणीही कुठेही गेला तरी सुद्धा ज्याप्रमाणे विजापूरच्या किल्ल्याभोवती एक मोठा खंदक पाण्याने भरलेला होता किंवा आहे व त्यामध्ये शत्रूचे सैन्य पडून मृत्यू ओढवून घेत होते मग खंदकात पडून मरण्यापेक्षा आपण सर्वांनी लढू या आणि जिंकूया असा माझा पक्षातील पदाधिकऱ्यांकडे आग्रह आहे व त्यासाठी वेळ पडल्यास पक्षाने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.मला विरोधी पक्षनेता पद मिळण्याकरता मी नाराजीचे नाटक करत आहे हे सातत्याने माध्यमांवर दाखवणे हे तर माझ्या ४३ वर्षाच्या राजकीय सिद्धांतावर प्रचंड असा अन्याय करणारे आहे असे जाधव यांनी म्हटले.मी दिलेली वेळ आणि शब्द पाळतो.आता माझ्या उत्तरार्धाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मी माझ्या तत्त्वांना मूठ माती द्यावी असे मला अजिबात वाटत नाही उलट मूळ शिवसेनेवर झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही न्याय मागत आहोत पण तिथेही तारीख पे तारीख आम्हाला मिळत आहे पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सिद्ध करण्याकरता लढत राहू आणि सिद्ध करून दाखवू असेही भास्कर जाधव यांनी शेवटी स्पष्ट केले.