मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती व या योजनेतंर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात.एवढेच नाही तर निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने आश्वासन दिले होते की जर पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आले तर १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येतील.आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येऊन काही महिने झाले आहेत मात्र अद्याप लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याच्या आश्वासनावर कोणताही निर्णय झालेला नाही.यातच आता लाडकी बहीण योजनेबाबत काही निकष लावल्याची चर्चा आहे व एवढेच नाही तर अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेमधून वगळण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे.दरम्यान आता लाडकी बहीण योजनेबाबत बोलतांना काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी एक मोठा दावा केला आहे.५० लाख लाडक्या बहि‍णींची चौकशी सुरु असल्याचे कल्याण काळे यांनी म्हटले आहे तसेच हळूहळू ही लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचेही विधान खासदार कल्याण काळे यांनी माध्यमांशी बोलतांना केले आहे.त्यांच्या या विधानामुळे लाडकी बहीण योजनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.