धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा !! संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांचा आज राजीनामा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ मार्च २५ मंगळवार
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,“धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे.मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.”
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.जर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नाही तर सभागृहाचे कामकाज रोखतील असा इशारा आज विरोधकांनी दिला होता.बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती.त्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर एक आरोपी अद्याप फरार आहे.२७ फेब्रुवारी रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीड जिल्हा न्यायालयात सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र सादर केले ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा आणि त्यासंबंधित दोन प्रकरणांचा समावेश आहे.बीडमधील केज पोलिस ठाण्यात सरपंच देशमुख यांची हत्या,आवदा कंपनीला खंडणी मागण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले… !!
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला ८० दिवस उलटले आहेत.अद्याप या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला शिक्षा झालेली नाही.दरम्यान याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले व या दोषारोप पत्रातून अनेक खुलासे झाले आहेत.मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे.दुसऱ्या बाजूला सीआयडीच्या दोषारोप पत्रातून या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत.काळीज चिरणारे ते फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली.वाल्मिक कराड व त्याच्या टोळीविरोधात कठोर कारवाई करण्याची व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती.दरम्यान घटनेच्या ८० दिवसांनंतर देशमुख कुटुंबाच्या संघर्षानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) त्यांचा राजीनामा दिला आहे.मुंडे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार म्हणाले,“धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे.त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.”
तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.यावेळी ते म्हणाले, “आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे.त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे.धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून आम्ही त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केले आहे.”संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.त्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर एक आरोपी अद्याप फरार आहे.२७ फेब्रुवारी रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीड जिल्हा न्यायालयात याप्रकरणी तब्बल १,२०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले.ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा आणि त्यासंबंधित आणखी दोन गुन्ह्यांच्या प्रकरणांचा समावेश आहे.बीडमधील केज पोलिस ठाण्यात सरपंच देशमुख यांची हत्या,अवादा कंपनीकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अद्याप याप्रकरणी कोणालाही शिक्षा झालेली नाही.