आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदापासून राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास,वन,बंदरे,विधीमंडळ कामकाज,क्रीडा,युवक कल्याण यासह वेगवेगळी मंत्रिपदे भूषविली असून ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते.राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत परतलेले भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही ठाकरेंच्या सोबतच राहिले.ते या निवडणुकीत कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार आहेत.भास्कर जाधव हे अतिशय आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळख असलेले भास्कर जाधव याचा फायदा आता पक्षाला होणार आहे.विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचं नावही चर्चेत होते मात्र अंतिम शिक्कामोर्तब जाधव यांच्या नावावर झाले आहे.महाविकास आघाडीच्या बैठकीत ही निवड करण्यात आल्याने आता या नावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून मंजुरी मिळते का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले.त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला शरद पवार यांच्या पक्षाने ठेवल्याची चर्चा सुरू झाली असतांना त्यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून त्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नसल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.