दरम्यान चिटणीस पार्क आणि महाल भागात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.काल दुपारी उशिरा कोतवाली आणि गणेशपेठ येथेही हिंसाचार पसरल्याची माहिती मिळाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.काही समाजकंटकांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने करीत रस्त्यावरी वाहनांची तोडफोड केली.ई रिक्षा आणि ऑटो रस्त्यावर उलटवून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला.रस्त्यावर उभ्या दुचाकींचीसुद्धा तोडफोड केली व यामध्ये सर्वाधिक नुकसान ई रिक्षाचे झाले आहे. पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून पोलीस आयुक्त,सहआयुक्तांसह सर्वच अधिकारी महालमध्ये दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.काल सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान शिवाजी चौकाजवळ एका गटाने घोषणाबाजी सुरू केली यामध्ये त्यांचा विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलना संदर्भात त्यांचा रोष होता व घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजीला सुरुवात केल्याने वाद वाढला.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना पांगवले मात्र पुढे चिटणीस पार्कच्याकडील भालदारपुरा दिशेने पोलिसांवर दगडफेक सुरु झाली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या.
नागपुरात दंगल नेमकी कशामुळे भडकली ? असा आहे घटनाक्रम !!

दुपारी दोन वाजता औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती.त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या.ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली.दुपारी चारपर्यंत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाच वाजता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करुन बोलावले परंतु पोर्टलच्या पत्रकारांशिवाय कुणीही तिकडे फिरकले नाही. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले.रात्री सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी केली.रात्री साडेसात वाजता पोलिसांनी त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.रात्री आठ वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला.त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला व त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला.रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली त्यामुळे वाद चिघळला.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले.दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.पोलिसांनी जमावावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या.दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरु केले.काहींनी जाळपोळ केली.रात्री ८.४० पासून वाजतापासून दंगल उसळली.रात्री नऊ वाजतापासून पोलिसांनी ‘कोम्बींग ऑपरेशन’ राबवून धरपकड सुरु केली.रात्री १० वाजतापर्यंत २० जण ताब्यात घेतले आणि धरपकड सुरुच आहे.यात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
” जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल” !! नागपूर हिंसाचारा वरून मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया !!

औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हिंसाचार झाला आहे व दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार,नागपूरच्या महाल परिसरात दोन गटातील लोक समोरासमोर आले व दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली तसेच त्यानंतर जाळपोळही करण्यात आली यामध्ये अनेक वाहनांची तोडफोडही करण्यात आली.त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करून गर्दी पांगवावी लागली.सध्या परिसरात तणाव असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले,नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे.काही लोकांनी दगडफेक केली अगदी पोलिसांवरही हे चुकीचे आहे.मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.या घटनेवर व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले,कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे.जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे.नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो.जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
पोलीस कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाचा जवान जखमी !!
नागपूरचे डीसीपी अर्चित चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना काही अफवांमुळे घडली आहे.आता परिस्थिती नियंत्रणात आहे.आमचे पथक येथे उपस्थिती असून मी सर्वांना आवाहन करतो की कोणीही कारणाशिवाय घराबाहेर पडू नका किंवा दगडफेक करू नका.दगडफेक सुरू होती म्हणून आम्ही बळाचा आणि अश्रूधुराचा वापर केला.अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “२ जेसीबी आणि २-३ इतर वाहने पेटवण्यात आली आहेत व यात आमचा एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला आहे.”
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही: एकनाथ शिंदे !!
नागपूरमधील हिंसाचारात काही पोलिसही जखमी झाले आहेत यावर प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असे म्हटले आहे.याचबरोबर ही घटना जर नियोजीत असेल तर दुर्दैवी असल्याचेही म्हटले आहे.
नागपुरात संचारबंदी अधिसूचना जारी !! पोलिसांना प्रभावित रस्ते बंद करण्याचे आदेश !!

नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार,पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील.कोतवाली,गणेशपेठ,तहसील, लकडगंज,पाचपावली,शांतीनगर,सक्करदरा,नंदनवन,इमामवाडा,यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारंबदी लागू करण्यात आली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रभावित भागातील रस्ते बंद करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.संचारबंदीचे उल्लंघन करणारा कोणीही भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत दंडनीय राहील.दरम्यान नागपूरचे पोलीस आयुक्त रविंदर सिंगल यांनी रहिवाशांना आश्वासन दिले की परिस्थिती आता नियंत्रणात आहे. ते म्हणाले,“सध्या परिस्थिती शांत आहे. एक फोटो जाळण्यात आला त्यानंतर लोक जमले.या गर्दीला पांगवण्याचा आम्ही प्रयत्न केला.या संदर्भात आम्ही कारवाईही केली.आरोपींवर कारवाई केली जाईल.”
“नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे.काही लोकांनी दगडफेक केली अगदी पोलिसांवरही.हे चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे”, असे फडणवीस म्हणाले.
“जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे.नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो.जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.