“शिवरायांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी एकाही रुपयाची तरतूद केलेली नाही” !! उदयनराजे भोसलेंचा सरकारला घरचा आहेर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ मार्च २५ शनिवार
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली होती.संभाजीराजे यांनी सरकारला ३१ मेपर्यंतची मुदत देखील दिली असून दुसऱ्या बाजूला काही लोकांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास विरोध केला आहे.पाठोपाठ भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही यावर भाष्य केले आहे.रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी सरकारने इतिहासकारांची एक समिती नेमावी अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे तसेच उदयनराजे यांनी नमूद केले की वाघ्या कुत्र्याबाबत इतिहासात कुठेही नोंद नाही. दरम्यान “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी एकाही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही” अशी खंत देखील उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.मुंबई जवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा युती सरकारने केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन देखील केले होते.अद्याप या स्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही यावरून उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तसेच ते म्हणाले,“शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचे मलाही निमंत्रण होते मात्र अद्याप या स्मारकासाठी एकही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही.”
‘सरकार काय बोळ्याने दूध पिते का ?’ !! खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला संताप !!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केली जातात व या विरोधात सरकारने कडक कायदा करण्याची मागणी उदयनराजे भोसले यांनी केली तसेच हा कायदा पारित करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली.या संदर्भात बोलतांना उदयनराजे भोसले म्हणाले की, “माझे असे म्हणणे आहे की जर त्यांनी विशेष अधिवेशन बोलावले नाही तर याचा अर्थ असा होईल की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान व्हावा ही त्यांची सर्वांची इच्छा दिसते.मग लोकांनी यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.तुम्ही ज्या पक्षाचे खासदार आहात त्याच पक्षाचे सरकार आहे व त्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत.मग मुख्यमंत्री तुमचे ऐकत नाहीत असे तुम्हाला वाटते का ? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला,यावर उदयनराजे भोसले म्हणाले की,एक लक्षात घ्या,वारंवार किती वेळा सांगायचे ? एकदा सांगितले,दोनदा सांगितले.त्यांना सर्वांना कळायला हवे ना ? ते काय बोळ्याने दूध पितात का ? जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होतो तेव्हा त्यांना दिसत नाही का ? दंगली होतात, अनेकांचे प्राण जातात.याला कारणीभूत कोण ? जर तुम्ही कायदा पारित केला नाही तर हेच सर्व यासाठी जबाबदार आहेत असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी टीका केली.
वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भातील तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही,असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले,“वाघ्या,वाघ्या, कोण वाघ्या ? येथे एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तसेच वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत एक इतिहासकारांची समिती नेमली पाहिजे.मग ती समाधी तिथे कधी आली ? का आली ? इतिहासात तर अशी नोंद नाही.काहीका असेना पण त्या माध्यमातून योग्य तो निर्णय घ्यावा” असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही आधारस्तंभ मानता ना ? मग अजून त्यांचा शासन मान्य इतिहास प्रकाशित का झाला नाही ? अनेक महापुरुषांचा शासन मान्य इतिहास मान्य झाला. पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनाच विसरलात?”, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.तसेच मराठ्यांच्या ज्या राजधान्या होत्या,राजगड असेल किंवा रायगड,सातारा यासाठी एक शिव स्वराज्य सर्केट स्थापन केले पाहिजे” अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे.