यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील दहिगाव येथून जवळच असलेल्या बोराळे शिवारातून अनेक शेतकऱ्यांच्या विविध पंपाच्या केबल चोरीस गेल्याने शेतकरी हैराण झाले असून पोलीस प्रशासनाने शेत शिवारात रात्रीची गस्त घालावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान दि.७ एप्रील रोजी रात्रीच्या सुमारास बोराळे शिवारातील देविदास धांगो पाटील यांच्या सहा विद्युत पंपाच्या तर किशोर मधुकर महाजन,रतन मेघश्याम चौधरी, बाळू लक्ष्मण पाटील यांचेसह अनेक शेतकऱ्यांच्या शेत विहिरीमधील वीज पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी तोडून चोरून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.सध्याच्या परिस्थितीत शेतातील पिकांना पाणी भरणे अत्यावश्यक आहे व वाढत्या तापमानाने पिकांना पाण्याची गरज आहे त्यातच चोरट्यांचा धुमाकूळ वाढलेला आहे याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे असे आरोप शेतकरी करीत आहेत.पीक संरक्षण संस्थांनी आणि पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी व शेती साहित्यांच्या होणाऱ्या चोऱ्यांच्या प्रकारांना आळा बसवावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.यावल तालुक्यातील दहिगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासुन अनेक प्रकार होत आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग अधिकच वैतागला असल्याचे दिसून येत आहे .