राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीला मनसेचा विरोध !! ही सक्ती महाराष्ट्रात खपवून घेणार नाही..ही मागे घेण्यात यावी !! राज ठाकरे यांचा इशारा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ एप्रिल २५ गुरुवार
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिली पासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली असून याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोध केला आहे तसेच ही सक्ती महाराष्ट्रात खपवून घेणार नाही व ही मागे घेण्यात यावी नाही तर संघर्ष अटळ आहे असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.याबाबत आपल्या भावना व्यक्त करतांना राज ठाकरे यांनी एक पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की,ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.सरकारचे सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत व ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही तसेच ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे परिणामी ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचे त्रिभाषेचे सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतेच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका.या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत ? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे.दरम्यान प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो,परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे.महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे.अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही.आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत !.महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे व या सगळ्याकडे पाहिले तर लक्षात येते की सरकार हा संघर्ष मुद्दामहुन घडवत आहे.येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे ? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा व त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असे काही नाही तसेच त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे हे समजून घेणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट असून सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही.मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.कर्जमाफी करू असे निवडणुकीच्या आधी सांगितले पण पुढे ती केलीच नाही त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे.जेव्हा सांगण्यासारखे किंवा ठोस दाखवण्यासारखे काहीच नसते तेव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय अशी शंका यावी अशीच पाऊल सरकारकडून उचलली जात आहेत.बरे हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का ? आणि करून तर बघा तिथली सरकारेच पेटून उठतील.इथले राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळ खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे.बाकीच्यांचे आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणघेण पण नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही.महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही.शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तके दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तके विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी.प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का ? नाही ना ? मग ही जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असे माझे सरकारला आवाहन आहे.पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत.माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना,भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती आहे की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडे जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील.आज भाषा सक्ती करत आहेत उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील.म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.