यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ मे २५ सोमवार
आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृह व्यवस्थापनात गुणवत्ता,नवोन्मेष व डिजिटल शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या आश्रमशाळांचा माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत प्रथमच गौरव करण्यात आला असून जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच वस्तीगृहांच्या सर्वांगीण कामगिरीचा यथोचित सन्मान करण्यासाठी ३ मे २५ रोजी जिल्हा नियोजन कार्यालय जळगाव येथे सुंदर माझी आश्रमशाळा व वस्तीगृह बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.माहेश्वर रेड्डी यांची उपस्थिती लाभली.प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आश्रमशाळांचे गुणवत्ताधिष्ठित व नवोन्मेषावर आधारित मूल्यांकन करण्यात आले.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आश्रमशाळांना ‘गुणवत्तेचा गौरव व डिजिटल शिक्षण प्रोत्साहन सन्मान’ देण्यात आला.शासकीय शाळा गटातून आश्रमशाळा लालमाती तालुका रावेर (मुख्याध्यापक : मनेश तडवी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.शासकीय आश्रमशाळा वाघझिरा तालुका यावल (मुख्याध्यापक :अर्जुन महाजन) व शासकीय आश्रमशाळा सार्वे,तालुका पाचोरा (मुख्याध्यापक : सदाशिव पवार) यांना संयुक्त द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.अनुदानित आश्रमशाळा विभागात अनुदानित आश्रमशाळा पिंपळे,ता.अमळनेर (मुख्याध्यापक : उदय पाटील) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर अनुदानित आश्रमशाळा लोहारा,ता.रावेर (मुख्याध्यापक : सुनील सपकाळे) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.आदिवासी मुलींचे वस्तीगृह जुने,जळगाव (गृहपाल : श्रीमती अलका दाभाडे) व आदिवासी मुलांचे वस्तीगृह नवीन,जळगाव (गृहप्रमुख : वासुदेव बच्छे) यांना क्रमशः प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला.हा सोहळा केवळ बक्षीस वितरणापुरता मर्यादित नसून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण,उत्कृष्ट व्यवस्थापन व डिजिटल शिक्षणाच्या स्वीकाराची नवी दिशा दाखवणारा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.प्रकल्प कार्यालयाकडून मागविण्यात आलेल्या प्रस्तावांच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली व या प्रक्रियेमुळे आश्रमशाळांनी आपली व्यवस्था,गुणवत्ता व तंत्रज्ञान वापर सुधारण्याची जाणीवपूर्वक पावले उचलली आहेत.हे उपक्रम केवळ आश्रमशाळांचा सन्मान करत नाहीत तर आश्रमशाळां साठी योग्य ते सर्व शैक्षणिक व प्रशासकीय मापदंड निश्चित करतात यामुळे आश्रमशाळांना प्रेरणा मिळेल.सतत प्रगतीशील राहण्याची दिशा मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्ता असलेले आधुनिक व प्रवाहाशी जोडणारे शिक्षण सहज उपलब्ध होईल यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्णत्वाकडे नेणारा मार्ग स्पष्ट झाला आहे.
या यशस्वी उपक्रमाच्या अमलबजावणीत सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे,जावेद तडवी,राजेंद्र लवणे,संदीप पाटील,पवन पाटील,(कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ) मिलिंद पाईकराव व विश्वास गायकवाड यांचे विशेष योगदान राहिले आहे.या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्ताधिष्ठित शिक्षणाचा प्रवेश देणे आणि आश्रमशाळांना एक प्रभावी,सुस्थितीत व आधुनिक प्रणालीकडे नेणे आहे.भविष्यात या नवोन्मेषपूर्ण पद्धतींच्या आधारावर आणखी अधिक आश्रमशाळांचा समावेश करून अधिकाधिक आदिवासी विद्यार्थ्यांना उच्चतम दर्जाचे शिक्षण मिळवून देणे हे याचे अंतिम ध्येय आहे.आश्रमशाळांमधील सतत सुधारणा,नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शिक्षणाच्या गुणवत्तेतील प्रगती ही योजनेसाठी एक दीर्घकालीन दिशा असणार आहे.