यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ मे २५ शुक्रवार
तालुक्यातील दहिगाव व परिसरात लगीन घाई सुरु असतांना पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने वराड्यांसह शेतकऱ्यांची धावपळ झाली असून आज दि.१६ मे शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजेचे सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे गावात बऱ्याच ठिकाणी असलेल्या लग्न समारंभात वराडी मंडळीची व लग्नकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली तर दुसरीकडे शेतमाल तयार करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ झाली.
दरम्यान आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते व ऊन सावलीचा खेळ सुरू होता.यात गाव व परिसरात दहा ते बारा लग्न कार्यक्रम होते व दुपारचे लग्न असल्याने या लग्नात ऐन जेवणावळीच्या वेळेस पावसाने जोरदार आगमन केले परिणामी लग्न वऱ्हाडी मंडळी यांची चांगलीच धावपळ झाली.तर दुसरीकडे सध्या परिसरात भुईमुंग खांडणे सुरू असून शेतातच मजूर असतांना अचानक पावसाचे आगमन झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेंगा भिजल्या तसेच वाळत घातलेला मका ओला झाला त्याचबरोबर कोरडा झालेला चारा ओला चिंब झाला.दरम्यान परिसरातील मोहराळा, कोरपावली,हरिपुरा,सावखेडासिम,दहिगाव या भागात देखील पावसाच्या सरी कोसळल्या.यात सुदैवाने वादळ झाले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले नाही.