‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ बैठकीत उडाला गोंधळ !! गटविकास अधिकाऱ्यांवर आमदार व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ जून २५ मंगळवार
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमाव्दारे आयोजीत कार्यक्रमात यावल पंचायत समिती सभागृहात आयोजित तक्रार निवारण सभेची नियोजीत बैठकीत पुर्णपणे नियोजनाच्या अभावीने मोठा गोंधळ उडाला.पंचायत समिती प्रशासनाच्या या गचाळ नियोजनामुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह रावेर यावलचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे आणि चोपड्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.तसेच गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्या कामावर संतप्त होत त्यांना सभेतच खडे बोल सुनावण्यात आले.
सभेच्या सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण होते.पंचायत समितीच्या लहान सभागृहातच कार्यक्रम आयोजित केल्याने आणि अधिकाऱ्यांनीच सभागृह भरल्याने तक्रारदारांना व्यवस्थित उभे राहण्यासाठीही जागा मिळाली नाही यामुळे अनेक तक्रारदारांना आपल्या समस्या व्यवस्थित मांडता आल्या नाहीत.नागरिकांनी घरकुलचे रखडलेले अनुदान,गोठ्यांच्या प्रकरणातील अडचणी आणि गटविकास अधिकारी कार्यालयात भेटत नसल्याच्या अनेक तक्रारी आमदारांकडे आणि सीईओंकडे मांडल्या.चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी नागरिकांना शांत करून प्रशासना सोबत आढावा घेण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर सभागृहात केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असताना घरकुलच्या रखडलेल्या अनुदानाचा आढावा घेण्यात आला.लाभार्थ्यांना घरकुलचा ३ हजार दुसरा हप्ता खात्यात जमा झाला नसल्याचे यावेळी प्रचंड नाराज असलेल्या नागरीकांनी उघडपणे बोलवुन दाखवले.घरकुल लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर अनुदान प्रलंबित का राहिले यावरून अधिकारी आणि आमदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.याआधी काही दिवसापुर्वीच झालेल्या आढावा बैठकीमध्ये देखील पंचायत समितीच्या कारभारावर ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्या बेशिस्त व आर्थिक विषयाने गोंधळलेल्या भोंगळ कामकाजावर सर्वसामान्य नागरीकांपासुन तर लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गात मोठया प्रमाणावर नाराजी असल्याचे या तक्रार निवारण बैठकीत दिसून आले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी,संचालक सूर्यभान पाटील,कृउबाचे माजी सभापती व संचालक हर्षल पाटील,भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी,अनिल पाटील,विलास चौधरी,कृउबाचे संचालक उजैनसिंग राजपूत भरत चौधरी,मुन्ना पाटील,जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे,डॉ.नरेंद्र कोल्हे यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे,पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी केले.