यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ जून २५ मंगळवार
येथील यावल शहर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने शहरातील विविध नागरी समस्यांचे निवेदन व स्मरणपत्र नगरपरिषद प्रशासनाला प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा करून नुकतेच निवेदन देण्यात आले.यात प्रामुख्याने यावल शहरातील बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्ता दुरुस्ती बाबत (स्मरणपत्र),मेन रोड वरील अपूर्ण राहिलेली नाले सफाई पूर्ण करणे बाबत (स्मरणपत्र) आणि यावल शहरातील वीसकळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत व वेळेनुसार करणेबाबत व इतर कामे करण्याबाबत सविस्तर चर्चा यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी निशिकांत गवई तसेच संबधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली व निवेदन देण्यात आले.त्याचप्रमाणे यावल शहरातील साफसफाईबाबत देखील चर्चा करण्यात आली.पांडुरंग सराफ नगर येथील खोलखड्डयाची चारी बुजण्याबाबत बोलण्यात आले.
याशिवाय शिवसेना ( उबाठा) ने दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की बोरावाल गेट ते भुसावळ नाका रस्त्याबाबत यापूर्वी काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते परंतु अद्याप पावेतो हा रस्ता दुरुस्ती व नूतनीकरण मंजूर असून देखील करण्यात आलेला नाही.ह्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून गावाच्या प्रवेश दारावरच चिखल झालेला असून या रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता आहे.तरी त्वरित दुरुस्ती वा तात्पुरती मुरूम टाकून रस्ता वापरता योग्य करण्यात यावा.मध्यंतरी यावल शहरातील गटारी नाले सफाई करण्यासाठी शिवसेनेने निवेदन दिल्यावर काम सुरू केले होते मात्र अपूर्ण काम करण्यात आले.म्हसोबा मंदिर ते बोरावाल गेट,चोपडा रोड ते बस स्थानक,भुसावळ टी पॉइंट ते भुसावळ रोड ही नाले सफाई करण्यात आली नाही.जास्त पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास ह्या मार्गावर घात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाणी रस्त्यावर साचल्यास नागरिकांना अनेक अडचणींस तोंड द्यावे लागेल.तरी तातडीने नाले गटारी सफाई करावी.
शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा वेळापत्रक विस्कळीत झालेला असून काही भागात २-३ दिवसा आड तर काही भागात ४-५ दिवसा आड पाणीपुरवठा होत आहे.तर नियमित वेळे नुसार न होता कधी सकाळी तर कधी दुपारी तर कधी संध्याकाळी होत आहे त्यामुळे पाणी भरणाऱ्या महिलांची,मजुरीला जाणाऱ्या कष्टकऱ्यांची,नागरिकांची तारांबळ उडते.यावल शहरातील सर्वच नळधारक सारखी पाणीपट्टी भरत असतांना वेळेचा व पुरवठ्याचा भेदभाव का केला जातो आहे असे नागरिक विचारत आहेत.तरी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत नियमित वेळे नुसार पाणीपुरवठा केला जावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी यावल शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,तालुका उप प्रमुख शरद कोळी,माजी तालुका प्रमुख कडू पाटील,संघटक पप्पू जोशी,शहर उप प्रमुख संतोष धोबी,शहर उप प्रमुख योगेश राजपूत पाटील विभाग प्रमुख प्रकाश वाघ,हुसेन तडवी,योगेश चौधरी,विजय पंडित कुंभार,पिंटू कुंभार,विभाग प्रमुख सारंग बेहेडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.