केळी बाजारभाव नियंत्रणासाठी व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करा !! यावल बाजार समिती बैठकीत जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ नोव्हेंबर २५ शुक्रवार
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे हे उपस्थित होते.केळी बाजारभावातील तफावत दूर करण्यासाठी शेतकरी तसेच बाजार समिती व व्यापारी यांची संयुक्त बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नुकतीच बोलाविण्यात आली होती.
केळी भावातील बोर्डावर घोषित दर आणि प्रत्यक्ष खरेदी यात निम्म्याहून अधिक तफावत आहे यासंबंधी यावल बाजार समितीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था जळगाव यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता व त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आज याच समस्येचा सामना करीत असून सर्व बाजार समित्यांनी एकसमान हिशेब पट्टी व्यापाऱ्यांना देणे बंधनकारक करावी,व्यापाऱ्यांचे नियमित दप्तर तपासणी करावी त्याच प्रमाणे बाजार समितीच्या वांधा समितीच्या माध्यमातून व्यापा-यांवर कडक निर्बंध लावावेत.केळी भावाच्या संदर्भात ब-हाणपूर बाजार समितीशी म.जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून चर्चा झाली होती व तेथील लिलावातील त्रुटी दूर करण्याबद्दल जिल्हाधिकार्यांनी सूचना देखील केल्या होत्या.बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना लायसेन्स देतांना बँक गॅरंटी घेणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.सर्वात महत्वाचे म्हणजे व्यापाऱ्यांनी नैतिकता पळून व्यवहार करणे देखील महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या बद्दल सभापती राकेश फेगडे यांनी विवेचन केले.पूर्वी रास फरक पद्धतीने बाजारभाव रावेर बाजार समिती घोषित करत होती त्यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या गुणवतेनुसार भाव व भाव फरक मिळत होता.रास फरक मिळायला लागल्यास शेतकरी चांगल्या दर्जाचा माल पिकवणे सुरु करतील मात्र काही व्यापाऱ्यांनी संघटीतपणे हि पद्धत बंद पाडली असे त्यांनी सांगितले त्यामुळे व्यापाऱ्यांनी नैतिकता पाळून व्यवहार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.त्याच प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यासाठी बाजारभाव घोषित करणारी समिती असणे अत्यंत आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले.बाजार समिती संचालक पंकज चौधरी,उज्जैनसिंग राजपुत,सागर महाजन,सुनील बारी यांनी देखील शेतकऱ्या पुढील समस्या विषद केल्या.यावेळी सभापती राकेश फेगडे यांनी मागणी केळी कि,आमदार अमोल जावळे यांच्या निर्देशानुसार यावल प्रक्षेत्रात पाडळसा येथे केळी निर्यात सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी प्रस्ताव आपल्याकडे सादर करण्यात आलेला आहे त्याच्यावर कार्यवाही व्हावी.यावर भविष्यामध्ये यावल येथे केळीसाठी निर्यात सुविधा केंद्र उभारणी करण्यासाठी शासन गतिशील आहे व त्याचा फायदा शेतकऱ्यांना व येथील व्यापाऱ्यांना मिळेल.जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच केळीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक लावू असे आश्वासन जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिले.यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी देखील उपस्थित होते.