चुंचाळे येथील एका संतप्त शेतकऱ्यांने फिरवले उभ्या केळीवर ट्रक्टर !! केळी कवडीमोल विक्रीवरून हवालदिल शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० नोव्हेंबर २५ सोमवार
तालुक्यातील चुंचाळे येथील एका शेतकऱ्याने दिड लाख रूपये खर्च लावुन केळी पिक उभे केले होते व आता कापणी योग्य केळी झाल्यावर केळीला मातीमोल भाव मिळत आहे.अशा वेळी कापणी करून व्यापाऱ्यापर्यंत केळी पोहच केली तरी त्यातुन शेतकऱ्याच्या हाती कापणी व वाहतुक व नंतर शेती तयार करण्याचा खर्च देखील निघणार नाही म्हणुन संतप्त शेतकऱ्याने थेट कापणी योग्य झालेल्या या केळीवर शुक्रवार रोजी ट्रक्टर फिरवत आपला संताप व्यक्त केला.दरम्यान अजुन काही दिवस या केळीला पाणी पुरवठा करून परिपक्व करण्यात वेळ घालवण्यापेक्षा दुसरे पिक तरी पेरता येईल असे प्रसंगी शेतकऱ्याने सांगीतले तसेच कवडीमोल भावावर मात करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या घामाचे सोने म्हणजेच केळी आज बाजारात कवडीमोल दरात मांगीतली जात आहे.कष्ट आमचे आणि नफा दुसऱ्यांचा” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्याचे सावट दाटले आहे.सदरहू या केळी भावाच्या घसरणीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.यातच शुक्रवारी चुंचाळे (ता.यावल) येथील शेतकरी प्रदीप पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतात १ हेक्टर क्षेत्रावर ४ हजार केळी खोड लागवड केले होते.दरम्यान या केळी साठी वर्षभर त्यांनी मेहनत केली त्यावर लागवड पासुन ते उत्पादन पर्यंत खर्च तब्बल दिड लाख रूपये लागला.यात मजुरी,खत,पाणीपुरवठा,औषधी आदीवर खर्च त्यांनी केला व आज रोजी जेव्हा केळी कापणी योग्य झाली तेव्हा मात्र केळीच्या भावात प्रचंड घसरण झाली व प्रति क्विंटल केळीला केवळ २०० ते ३०० रुपये असा मातीमोल भाव मिळत आहे म्हणजे उत्पादन खर्चाच्या चौथ्या भागाइतकाही भाव मिळत नाहीये.केळी नाशवंत असल्यामुळे दर घसरले की व्यापारी मनमानी करतात व तोटा होईल हे ठाऊक असूनही शेतकऱ्यास केळी विकावीच लागते म्हणुन पडलेल्या केळी भावामुळे संतप्त झालेल्या शेतकरी प्रदिप पाटील यांनी थेट उभ्या केळी पिकावर थेट ट्रक्टर फिरवले आहे.
उत्पादन खर्च दुपटीने वाढला पण दर निम्माच असून व्यापाऱ्यांची मनमानी करीत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे.नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे दरवर्षी कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत असून शासन मदत तुटपुंजी आणि उशिरा मिळत आहे व अनेकांना तर लाभच नाही.यात पाण्याचा तीव्र तुटवडा व भूगर्भातील विहीरींचे पाणी हे जवळपास ४०० फूट खोलवर गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून अशा परिस्थितीत शेतकरी बांधव शेती करणार तरी कशी ? हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या !!
प्रदीप पाटील आणि इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे काही ठोस मागण्या केल्या असून यात केळीस हमीभाव (एमएसपी) जाहीर करून शासकीय खरेदी योजना राबवावी,व्यापाऱ्यांची मनमानी रोखण्यासाठी बाजार समित्यांवर कडक नियंत्रण ठेवावे व ‘बनाना क्लस्टर’ प्रकल्प तातडीने अंमलात आणावा.तसेच आमच्या श्रमाला योग्य दर मिळाला तर आम्ही जगाला केळी देऊ शकतो पण आता आम्हालाच जगण्यासाठी केळी विकावी लागते.रावेर-यावल परिसरातील शेतकरी आजही जिद्दी आहे पण शासनाने जर योग्य वेळी ठोस निर्णय घेतले नाहीत येणाऱ्या काळात ‘केळी पट्टा’ नाहीसा होण्याची भीती शेतकरी बांधवांनकडून व्यक्त केली जात आहे.शासनाने पुढाकार घ्यावा व केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा अशी शेतकरी बांधवांची एकमुखी मागणी आहे.