यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० जानेवारी २५ शनिवार
येथील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रोसेयो) विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी श्रमदानातून सामाजिक बांधिलकी जोपासली.सदर शिबिराच्या एका महत्त्वपूर्ण दिवशी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृती आणि बौद्धिक चर्चेच्या माध्यमातून जलसंधारण व आधुनिक शेतीचा संदेश दिला.दरम्यान दिवसाच्या पहिल्या सत्रात सर्व स्वयंसेवकांनी परिसरात ‘वनराई बंधारा’ बांधला.पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात श्रमदान केले.या बंधाऱ्यामुळे परिसरातील जलपातळी वाढण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या या कष्टाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
दुसऱ्या सत्रात विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये डॉ.पी.ए.सावळे यांनी ‘सेंद्रिय शेती’ या विषयावर मार्गदर्शन केले.रासायनिक खतांचा वापर टाळून शेती कशी समृद्ध करता येईल याचे सखोल ज्ञान त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.याच सत्रात दुसरे वक्ते डॉ.आर.डी.पवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा (रोसेयो) प्रसार आणि प्रचार यावर माहिती दिली.युवकांनी समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत कसे योगदान द्यावे हे त्यांनी पटवून दिले.अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाच्या अध्यक्षा दिव्या कोळी यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.आजच्या काळात विषमुक्त अन्नाची गरज लक्षात घेता सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य,कार्यक्रम अधिकारी आणि सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.शिबिराच्या या यशस्वी आयोजनामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.