मिनाक्षी पांडव,पोलीस नायक
मुंबई विभाग प्रमुख
राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून याबाबत शिक्षण विभागाकडून नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे.सदरील परिपत्रकानुसार राज्यातील शाळांना यंदा २ मे पासून ११ जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी राहणार आहे.तर सुटीनंतर पुन्हा १२ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत तसेच विदर्भात मात्र हि सुटी २६ जूनपर्यंत राहणार आहे.सदरील पत्रकानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार असून २ मे पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी ही ११ जून पर्यंत राहणार आहे त्यामुळे राज्यभरातील नवे शैक्षणिक वर्ष हे १२ जून पासून सुरू होणार आहे.विदर्भातील उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता या विभागातील नवे शैक्षणिक वर्ष हे २६ जून पासून सुरू होणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
परिपत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की,इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांना हा ३० एप्रिल रोजी किंवा त्यानंतरच्या उन्हाळी सुटीच्या काळात शाळांना जाहीर करण्याबाबत सुचविण्यात आलेले आहे.तसेच शाळांमध्ये लागू असलेल्या उन्हाळी किंवा दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून सदरील सुट्ट्या या नाताळ किंवा गणेशोत्सव दरम्यान समायोजन करणेबाबतचा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने देण्यात येणार आहे.त्याचबरोबर शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या ७८ पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षणाधिकाऱ्यांनी घेण्याबाबत परिपत्रकात म्हटले आहे.