सध्याचे मुख्यमंत्री विसर्जित होणार हे नक्की !! फक्त पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार?-सामनातून जोरदार टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
महाराष्ट्राच्या राजकारणात भलताच खेळखंडोबा सध्या सुरू असून राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्त्वात नाही पण राज्याला मुख्यमंत्री आहेत की नाही?असा प्रश्न पडला आहे.तसेच हे मुख्यमंत्री लवकरच जाणार व त्यांच्या जागी कुणाला बसवले जाणार हे आता बघायचे आहे असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.राज्याला मुख्यमंत्री आहेत का? हा प्रश्नच आहे.मुख्यमंत्रीपदावर रोज चर्चा झडत आहेत.मुख्यमंत्रीपद रिकामी नाही हे खरे आहे परंतु रिकामपणाचे उद्योग जोर धरू लागले आहेत.एका कार्यक्रमात अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाविषयी प्रश्न विचारला गेला ते म्हणाले २०२४ काय आत्ताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल.मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल हे सांगण गैर नाही.राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कधीपासून मुख्यमंत्री व्हायचे आहे.विखे यांना अजित पवारांविषयी विचारले असता त्यांचा सूर वेगळाच होता.आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे सांगून त्यांनी शिंदे-मिंधे गटाचे कपडे उतरवले.विखे पाटील यांच्यापुढे १०० पावले फडणवीस गेले आणि हळूच म्हणाले मुख्यमंत्रीपदाचे काय कोणीही इच्छा बाळगू शकतो पण योग्यता हवी ना? फडणवीस यांनी हे वक्तव्य हसत केले मात्र त्यात वैफल्य आणि त्रागा आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा हा त्रागा सवती मत्सराचा आहे.भर मंडपात वरमाला तयार असताना अचानक बोहल्यावर मिंध्यांना चढवून फडणवीसांच्या बाबतीत जे घडवले गेले त्यातून ते अद्याप सावरलेले दिसत नाहीत.मुख्यमंत्रीपदासाठी कधी विखे पाटील यांचे तर कधी अजित पवारांचे नाव चर्चेत आणले जाते आहे या दुःखाने बेजार झालेले फडणवीस हे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा परमोच्च अवस्थेला पोहचले आहेत ही अवस्था म्हणजे बेधुंद नशेचे शेवटचे टोक आहे.सध्याच्या राजकारणात कुणीही कोणाला डोळा मारतो हे अमृतावहिनींनी सांगितले.अहो पण हा काय संसार झाला? या सगळ्याबाबत मिंधे गटाचे गोगावले सांगतात आमच्या मनात मिंधेच.तशी दिल्लीची कमिटमेंट आहे.श्रीमान गोगावले असेही म्हणाले की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत व ते त्यांना शक्य नाही.अजित पवारांना काय व्हायचे आणि काय नाही हे ठरवणारा मिंधे गट कोण? गोगावले हे पवारांचे वकील आहेत का? सध्याचे मुख्यमंत्री विसर्जित होणार हे नक्की फक्त आता पाटावर कोणता गुळाचा गणपती बसवणार ते पाहायचे.महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ आणि अराजक कधीही माजले नव्हते.