उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदि मित्र संकल्पना निमित्त एकदिवसीय क्षेत्र कार्यकर्ता प्रशिक्षण उत्साहात
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
प्रत्यक्ष गावात राहून अभ्यास करण्यासाठी क्षेत्र कार्यकर्ता विद्यार्थ्यास आदि मित्र म्हणून नियुक्त करण्याची संकल्पना तयार करण्यात आली असून विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे प्रशाळा येथे नुकतीच एकदिवसीय क्षेत्र कार्यकर्ता (आदिमित्र) प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जिल्हा नियोजन समिती व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ही कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली.पालकमंत्री गुलाबराव पाटील,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत पेसा क्षेत्र गावांच्या गरजांवर आधारीत अभ्यास करण्यासाठी विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे प्रशाळा समाजकार्य विषयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.आदिमित्र यांना जिल्हयातील आदिवासी पेसा अंतर्गत असलेल्या ६३ (चोपडा-२५,यावल १६,रावेर-२२) गावांचा पी.आर.ए.तंत्राच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध विभागाच्या योजना आदिवासी कुटुंबांना मिळण्याकरीता वैयक्तिक लाभाचे तसेच उत्पन्न वाढीच्या योजनांचे फॉर्म भरुन घेईल तसेच लाभार्थ्यांस योजनेसाठी आवश्यक ती माहिती देवून त्यास लागणाऱ्या कागदपत्रांसह पात्र होण्यासाठी तसेच ज्या विभागाच्या लाभास पात्र असेल ते सर्व कागदपत्र एकत्र करुन आदिवासी विभाग यावल यांच्यामार्फत संबधीत विभागास दिले जाईल तसेच गावाच्या समस्यांचा अभ्यास करून गावकऱ्यांच्या मदतीने गाव विकास आराखडा तयार करुन संबंधित विभागास प्रस्ताव सादर करण्यासाठी मदत करणार आहेत.
सदरील एकदिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी तसेच प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,सहा.जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण,उप वनसंरक्षक जमीर शेख,यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार,सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा.अजय एस.पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी,प्रशाळेचे सर्व प्राध्यापक, अधिकारी,कर्मचारी उपस्थितीत होते.विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल माहेश्वरी म्हणाले की,नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणीसाठी आम्हाला प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन काम करावे लागेल त्यासाठी येणारा काळ विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदिमित्र यांना गावाच्या अभ्यासासाठी महत्त्वाच्या पाच बाबतीत प्रशिक्षीत केले.यावेळी अडचणीतून मार्ग, जीवन सूधार,योजनांची माहिती,पायाभूत सुविधा सुधार,गावविकास आराखडा तसेच लोकसहभागी अध्ययन तंत्र पी.आर.ए.चा वापर करुन गावाचा विश्वास संपादन करावा.लोकांच्या गरजा ओळखाव्यात त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका,संघटीत व्हा आणि गरजा शोधण्याकरिता संघर्ष करा या त्रिसूत्रीच्या सहाय्याने आदिमित्र यांना प्रशिक्षीत केले तसेच सहभागी अदिमित्र यांनी प्रत्यक्ष गावात जावून कसे बोलावे,समस्या कशा शोधाव्यात यांचे प्रशिक्षण देण्यात आले.विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांनी गाव विकासाच्या प्रश्नांवर आदिमित्र यांचे प्रात्याक्षिक घेतले.मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना बाबत माहिती दिली. यावेळी उप वनसंरक्षक जमीर शेख,यावल एकात्मिक प्रकल्प अधिकारी अरुण पवार,जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी दिपक ठाकूर,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ.हेमंत वाघोदे,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शरद लासुरकर यांनी त्यांच्या विभागासंदर्भात माहिती दिली.सूत्रसंचालन प्रा.वर्षा पालेखे यांनी केले तर आभार डॉ.दिपक सोनवणे यांनी मानले.