मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ मे २४ मंगळवार
सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात १३ जागांसाठी मतदान झाले असून यामध्ये मुंबई,ठाणे,नाशिक या महत्त्वाच्या शहरांचा सहभाग होता.मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक उत्साहाने घराबाहेर पडले.भर उन्हात उभे राहूनही त्यांनी मतदान केले पण निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले.आग ओकणारा सूर्य डोक्यावर आलेला असतांना आणि निवडणूक आयोगाच्या संथ वृत्तीमुळे मतदार नाराज होऊन मतदान न करताच माघारी परतले त्यामुळे मुंबईतील मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे ते आज माध्यमांशी बोलत होते.मतदार कंटाळतील व रांगेतून निघून जातील अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राबवली का ? अशी शंका वाटावी असे चित्र काल पाहायला मिळाले.मला प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा नाही पण जिथे जिथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल तिथेच कासवगतीने यंत्रणा चालू होती.भाजपाच्या किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे टक्का वाढू शकतो तिथे कोणत्याही अडचणीशिवाय मतदान घडवण्यात आले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
आम्ही जागृत होतो त्यामुळे त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाहीत,पैसे वाटप आम्ही पकडले मग काय करायचे ? मग अशा पद्धतीने यंत्रणा ढिली करायची.लोकांचा छळ करायचा.चार-चार तास लोकांना रांगेत उभे करायचे ही डिजिटल इंडिया आहे ना ? याचा अर्थ मोदींचे डिजिटल इंडिया फेल गेले,फेल करण्यात आले.निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशापद्धतीने यंत्रणा राबवली तरीही मतदारांवर फरक पडला नाही.आम्ही शेवटपर्यंत आवाहन केले की रांग सोडू नका.पहाट झाली तरी चालेल त्यामुळे अनेकठिकाणी रात्री ११ पर्यंत मतदान होऊ शकले. परंतु अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुर्दैवाने आपल्या लोकशाहीत घडले अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.हा लोकशाही आणि निवडणुकीचा अपमान आहे.आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो,पाहून आलो.महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात अशा पद्धतीने यंत्रणा बिघडवण्यात आली.१३ ही ठिकाणी भाजपाच्या आणि मित्र पक्षांचा पराभव होणार याची खात्री असल्याने शेवटचा डाव टाकण्यात आला तरीही माझी खात्री आहे की इंडिया आघाडीच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन यंत्रणा भ्रष्ट करणे यात भाजपा,मिंधे गट,अजित पवार माहीर आहेत.मशालीला मतदान होण्याची शक्यता होती तिथे यंत्रणा बिघडवण्यात आली.मुंब्र्यात एका तासांत फक्त ११ च मतदारांनी मतदान टाकले.मतदान प्रक्रियेवर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते.त्यांच्या मनात पराभवाची भीती आहे.ही चूक आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणली आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.