वर्धा -पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योग म्हणून कुक्कूटपालनाचा व्यवसाय केल्या जातो मात्र आता मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय होत असल्याने गावरानी कोंबडी मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे.याच कोंबडीच्या प्रेमात असणाऱ्या मांसाहारी खवय्यांना आता याच चवीची कोंबडी उपलब्ध झाली आहे.किंमत मात्र तगडी असून थेट तामिळनाडूतून या कोंबड्या वर्धा या शहरात आल्या आहेत.येथील इथापे फॉर्म्सवर तीन महिन्यापूर्वी कोंबडा प्रती नग सहा हजार रुपये तर कोंबडी चार हजार रुपये या दराने आणलेल्या आहेत.विशेष म्हणजे या कोंबडीचे दिलेले तीन महिन्याचे पिल्लू आता सहाशे ते आठशे रुपये दराने विकल्या जात आहे.महिन्यात पंधरा अंडी देणाऱ्या या अंड्याची प्रती नग किंमत तब्बल पन्नास रुपये आहे.कोंबडा प्रामुख्याने प्रजनन व झुंजीसाठी उपयोगात येतो तर कोंबडी रुचकर मास म्हणून विकल्या जाते.
तामिळनाडूतून चंद्रपूरचा दलाल या कोंबड्या विक्रीसाठी आणतो.वाहतूक व अन्य खर्चामुळे हा दर वाढतो.अल्पशा खाद्यावर गुजरान करणाऱ्या या कोंबड्या कोंडून ठेवण्याऐवजी शेतात मुक्तसंचार पद्धतीने पाळल्यास उत्पादकास अधिक लाभ मिळतो.अंडी अधिक पिवळसर व गावरानी कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठे असते.असील जातीची ही प्रजाती आहे.वजन अवघ्या एका वर्षात तीन किलोवर जाते.मटणाच्या दराने कोंबडीचे मास विकल्या जाते व चव पण तशीच असल्याचे इथापे बंधू सांगतात.एवढ्या महाग दराने मास घेणारे ग्राहक आहेत का?अशी विचारणा केल्यावर उत्तर मिळते की एकदा चवीच्या प्रेमात पडणारे मग वारंवार मागणी करीत असतात.अन्यथा ज्या दलालाकडून विकत आणले तोच पिल्ल विकत घ्यायला तयार असतो.भारतभर या कोंबड्या विकल्या जातात.विदर्भात अद्याप त्या प्रचलित व्हायच्या असल्याची माहिती मिळाली.इथापे फॉर्म्स वर ‘ हॅचींग ‘ची व्यवस्था असल्याने सोयीनुसार पिल्ल हवी तेव्हा उपलब्ध होत आहेत.गत एक दशकापासून कुक्कुट व्यवसायात असणारे इथापे बंधू कोंबड्या कधीच बंदिस्त न ठेवता त्यांना शेतात मुक्तपणे पाळतात.