
दरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विदर्भात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे.गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये ४०,गोंदियात २५, ब्रह्मपुरीत (चंद्रपूर) २०.४,अमरावतीत १०.४ मिमी पाऊस झाला असून काल सोमवारी दिवसभरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. कोकण किनारपट्टीवरही पाऊस सुरू झाला आहे.सोमवारी दिवसभरात कुलाब्यात ५१ मिमी,तर अलिबागमध्ये १४ मिमी पाऊस पडला.मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस झाला.महाबळेश्वरमध्ये दिवसभरात ६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मराठवाडय़ात बीडवगळता दिवसभर पावसाने उघडीप दिली होती.बीडमध्ये हलक्या सरी झाल्या आहेत.यादरम्यान पुणे,रत्नागिरी,रायगड,गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा व नागपूर येथे ‘ऑरेंज अॅलर्ट’ व कोल्हापूर,सिंधुदुर्ग,सातारा,मुंबई शहर,मुंबई उपनगरे,ठाणे,पालघर,वर्धा,यवतमाळ,अमरावती,अकोला,वाशिम, जळगाव,औरंगाबाद,जालना व बुलडाणा येथे ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला असून या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.