मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ फेब्रुवारी २५ रविवार
महायुतीत राज ठाकरे यांनी येऊ नये असे परखड मत महायुतीच्याच एका बड्या नेत्याने व्यक्त केले आहे.महायुतीला निवडणुकीत प्रचंड यश मिळाले आहे ज्यानंतर राज ठाकरे हे देखील महापालिका निवडणुकीच्या आधी महायुतीशी हातमिळवणी होईल अशी चर्चा आहे.उदय सामंत यांनीही राज ठाकरेंची शनिवारी भेट घेतली तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते.यानंतर आता आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना बरोबर घेऊ नये असे परखड मत व्यक्त केले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी युती होते कधी होत नाही.पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढायचे.आता महाविकास आघाडीत काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आहे मात्र हे तीन पक्षही एकत्र निवडणूक लढतील असे वाटत नाही.महायुतीने एकत्र निवडणूक लढवली पाहिजे अशी आमची भूमिका आहे असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
आम्हाला १० ते १२ जागा मिळाल्या पाहिजेत ही अपेक्षा आहे-आठवले !!
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये १० ते १२ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे असे रामदास आठवले म्हणाले.आम्हाला लोकसभा निवडणूक,विधानसभा निवडणूक यात एकही जागा मिळालेली नाही त्यामुळे आमची ही अपेक्षा आहे तसेच नवी महामंडळे स्थापन केली जातील त्यातील तीन अध्यक्षपदे तरी आम्हाला मिळाली पाहिजेत अशीही मागणी रामदास आठवलेंनी केली.
राज ठाकरेंना महायुतीत घेऊ नये कारण… !!
राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत व त्यांना महायुतीबरोबर घ्यायचे वगैरे चर्चा सुरु आहेत पण त्यांना घेऊ नये असे आमचे मत आहे.आरपीआय असतांना राज ठाकरेंची आवश्यकता नाही असे आमचे स्पष्ट मत आहे.आम्हाला आत्ताच काही मिळत नाही राज ठाकरे आल्यावर काहीच मिळणार नाही.लोकसभेत त्यांचा काही फारसा फायदा आम्हाला झालेला नाही.राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाणे अयोग्य आहे असे नाही पण मला वाटते की राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला आले पाहिजे.मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी सारखे जाणे काही योग्य नाही असेही रामदास आठवलेंनी म्हटले आहे.महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढली आहे.नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे याचा आम्हाला आनंद आहे असेही आठवले यांनी म्हटले आहे.