सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१३ मार्च २६ शुक्रवार
नीरा-बारामती रोड हा परिसरातील महत्त्वाचा आणि गावातील मुख्य रस्ता मानला जातो मात्र सध्या या रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खडी पडलेली असल्याने वाहनचालकांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकीस्वारांना वाहन चालवताना मोठी अडचण निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.ट्रक,डंपर,ट्रॅक्टर तसेच इतर जड वाहनांची सतत ये-जा सुरू असते त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झाला आहे.अचानक ब्रेक मारल्यास वाहन घसरण्याची शक्यता असल्याने अनेक वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवावे लागत आहे.
दरम्यान याच मार्गावरून शाळा आणि कॉलेजला जाणारी लहान मुले-मुली तसेच कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक प्रवास करत असतात त्यामुळे या रस्त्यावर सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस वाहतुकीची मोठी वर्दळ असते त्यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,हा रस्ता गावातील मुख्य मार्ग असल्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.रस्त्यावर पडलेली खडी त्वरित हटवून रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान या रस्त्याच्या देखभाल व स्वच्छतेबाबत संबंधित नगरपंचायत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.