राजू यादगिरीकर हे देगाव रस्त्यावर कोयनानगर परिसरात पत्नी भारती आणि ८० वर्षांची वृध्द आणि आजारी असलेल्या आईसह राहतात.त्यांच्या घरासमोरील रस्त्यावरून निघालेल्या उत्सव मंडळाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात ध्वनिवर्धकांच्या भिंती आणल्या होत्या.त्याचा प्रचंड त्रास आजारी वृध्द आईला होऊ लागल्याने ध्वनिवर्धकांचा आवाज कमी करावा म्हणून विनंतीवजा सांगण्यासाठी यादगिरीकर हे त्या मिरवणुकीत गेले होते परंतु त्यांची विनंती धुडकावून उलट उन्मादी पध्दतीने त्यांना ध्वनिवर्धकांच्या भिंतीसमोरच सक्तीने थांबवून ठेवण्यात आले.रात्री ते घरी परतले असता त्यांना काहीच ऐकू येईना म्हणून त्यांनी पत्नी भारतीसह तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेले.तपासणीअंती ध्वनीवर्धकांच्या प्रचंड दणदणाटी आवाजाने यादगिरीकर यांच्या कानाच्या नसा कमकुवत झाल्याचे निदान झाले त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी बहिरेपणा आला आहे व यापुढे त्यांना श्रवणयंत्राशिवाय ऐकायला येणार नाही.या प्रकारामुळे हादरलेल्या यादगिरीकर यांनी धाडस दाखवून थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे.उत्सवांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात वरचेवर नवनव्या सार्वजनिक उत्सवांची भर पडत असल्यामुळे प्रत्येक उत्सवाच्या मिरवणुकीत ध्वनिवर्धकांच्या भिंतीची सोलापूरकरांना तर महाराष्ट्र वासियांना चांगलीच भीती वाटू लागली आहे.