‘मराठ्यांनी स्वतःला संकुचित करु नये’ !! धनंजय मुंडेंच्या उल्लेखासह संभाजी भिडे यांनी मांडली रोखठोक भूमिका !!
मराठे स्वतःला संकुचित करून घेत आहेत !!
“शहाजी महाराज,राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळेच आज महाराष्ट्रासह संबंध देश दिसत आहे.‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले’,मराठे आरक्षण मागून स्वतःला संकुचित करून घेत आहेत.मराठ्यांनी आरक्षण मागायचे नसते,मराठ्यांनी देश चालवायचा असतो. संबंध देशाचा संसार चालविण्याचा समाज कुठे असेल तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे पण मराठ्यांना आपण कोण आहोत ? हे कळत नाही हे दुर्दैव आहे”, असेही संभाजी भिडे म्हणाले.
“संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा”, आमदार रोहित पवारांची मागणी !!
दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणून हा विषय इथेच संपत नाही तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची मागणी केली आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार म्हणाले,“मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा सामान्य लोकांच्या मनातील संतापाच्या उद्रेकाचा आणि देशमुख कुटुंबाच्या संघर्षाचा परिणाम आहे पण केवळ राजीनामा दिला म्हणून हा विषय इथंच संपत नाही तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची आणि सुधारित चार्जशीट दाखल करण्याची गरज आहे तरच संतोष देशमुख यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.त्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू!”

राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता !!
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भगिनी आणि भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या की,“धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे.मी त्याचे स्वागत करते.हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता.या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती.”
दरम्यान धनंजय मुंडे यांनीही त्यांनी मंत्रिपदाचा राजीनाम दिल्याची माहिती एक्सवर पोस्ट करून दिली.आपल्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की,“बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे.काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे.माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे सोपवलाला आहे.”
धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी कर्जतमध्ये रास्ता रोको आंदोलन !!
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्दयी पणे हत्या झाल्याचे नवीन फोटो मधून निष्पन्न होताच त्याचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे उमटले आहेत.आज संतप्त सकल मराठा समाज यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली.संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्दयीपणे केल्याचे आता उघड झाले आहे ही बाब आज निदर्शनास आल्यानंतर त्याचे पडसाद तात्काळ उमटले आहेत.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाची युवक एकत्र आले.त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनामुळे मेन रोड वरील सर्व वाहतूक ठप्प झाले होते.
यावेळी बोलताना सकल मराठा समाजाची समन्वयक रावसाहेब धांडे म्हणाले की,संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्दयपणे करण्यात आली आहे ते आता उघड झाले आहे.या खून प्रकरणातील सर्व आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत.यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आता उघड झाले आहे.यामुळे या घटनेला धनंजय मुंडे हे देखील जबाबदार आहेत.त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना सह आरोपी करण्यात यावे तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ पोलीस प्रशासनाने अटक करावी अन्यथा उद्या दिनांक पाच मार्च रोजी कर्जत शहर बंद ठेवण्यात येणार आहे.यावेळी एडवोकेट धनंजय राणे व राहुल नवले यांची भाषणे झाली.घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्यानंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व नायब तहसीलदार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.यामध्ये या घटनेचा निषेध करताना सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आरोपी करावे व दिनांक पाच मार्च रोजी कर्जत शहर बंद राहील असा इशारा देण्यात आला आहे.
“…तर धनंजय मुंडेंवर कारवाई होईल”, शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले, “तब्येतीचे कारण…” !!
संजय शिरसाट म्हणाले,“बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.त्या घटनेचा सर्वांनीच निषेध नोंदवला होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेवर भाष्य करताना सांगितले होते की या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होईल.कोणालाही माफी मिळणार नाही.गुन्हेगारांना कडक शासन होईल.आता या प्रकरणाचा तपास चालू आहे.सीआयडीने याप्रकरणी दोषारोप पत्र दाखल केले आहे.आता याप्रकरणी सुनावणी होईल.या हत्याप्रकरणात जो कोणी आरोपी निष्पन्न होईल त्याला कठोर शिक्षा होईल.न्यायालय आरोपींना जी शिक्षा देईल ती शिक्षा आपल्याला मान्य करावी लागेल.”सामाजिक न्याय मंत्री म्हणाले,“या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जात होते.धनंजय मुंडे वाल्मिक कराड याचा आका आहे वगैरे नाव घेतली जात होती मुंडे देखील आरोपी आहेत असे चित्र रंगवले जात होते मात्र आता त्यांनी तब्येतीचे कारण दाखवत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे त्या प्रकरणावर आता पडदा पडला आहे तब्येतीचे कारण देऊन राजीनामा दिला असला तरी या प्रकरणात ज्याचा कोणाचा हात असेल त्याला कठोर शिक्षा होईल हे निश्चित.मुंडे यांनी आता राजीनामा दिला आहे.तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास चालू आहे.या तपासात काही संशयास्पद आढळले तर धनंजय मुंडेंवरही कारवाई होईल.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त राजीनामा नाही तर…” !!
“धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सर्व आमदारांनी भूमिका मांडली.आता सर्वांना प्रश्न असा आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो सरकारकडे आधी आले नव्हते का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शीपणे काम करत असतील तर त्यांचे स्वागत आहे पण पारदर्शीपणे काम करत असताना त्यांचे हात कोणी बांधतंय का ? हा प्रश्न आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो आधीच मुख्यमंत्र्यांकडे आले होते का ? जर आले असतील तर मग धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची कारवाई आधीच का नाही झाली ?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
“मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नांचे उत्तर द्यायला पाहिजे.डिसेंबरपासून बीडच्या घटनेची चर्चा सुरु आहे.यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देताना त्यांनी तब्येतीचे कारण दिले.मी त्यांच्या तब्येतीबाबत काही बोलणार नाही पण राजीनामा देण्याचे नेमके कारण काय ? नैतिक जबाबदारी की तब्येतीचे कारण ? हे स्पष्ट करावे कारण अजित पवारांनी असे सांगितले की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला.आता बीडच्या घटनेतील एवढे फोटो बाहेर आल्यानंतर देखील धनंजय मुंडेंनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला असेल तर याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा या आधीच का घेतला नाही ? मग आता राजीनामा दिला आहे तर तो कोणत्या कारणाने दिला ? हे देखील सांगितले पाहिजे”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.“संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संबंधितील सर्व फोटो अधिवेशनाच्या काळात बाहेर कसे आले ? मग हे फोटो आधी बाहेर कसे आले नाहीत ? जर हे फोटो आधीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत आले असतील तर त्यांनी धनंजय मुंडेंचा याआधीच राजीनामा का घेतला नाही ? गेल्या दोन महिन्यांत सरकारने कोणतीही हालचाल का केली नाही ? या प्रश्नांचे उत्तरही सरकारने दिले पाहिजे तसेच आता फक्त राजीनामा नाही तर अजून ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यावरही सरकारने लक्ष दिले पाहिजे.सध्याच्या परिस्थितीत सरकारपेक्षा महाराष्ट्र बदनाम होतोय”,असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.