“शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपा खासदाराला अटक का नाही” ? !! राऊतांचा व्हिडीओ शेअर करत संतप्त सवाल !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ मार्च २५ शनिवार
समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर मोठा वाद झाला होता. विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर त्यांचे निलंबन देखील करण्यात आले.‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते.दरम्यान याच मुद्द्यावर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांना काही प्रश्न विचारले आहेत.शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना वेगळा कायदा आहे का ? असा थेट सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी काही दिवसांपूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केले होते यानंतर मोठा गदारोळ झाला होता.या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी सुधांशु त्रिवेदी यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे तसेच त्यांनी सुधांशु त्रिवेदी यांच्यावर देखील अबू आझमी यांच्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे असे म्हटले आहे.इतकेच नाही तर त्यांना अटक का झाली नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केले होते.औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी औरंगजेबाचा वाद धार्मिक नव्हता तर राजकीय वैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याचे वक्तव्य आझमी यांनी केले होते.आझमी यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनीही तीव्र आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती.सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी मंगळवारी आझमी यांच्यावर निलंबन आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले होते.त्यानंतर आझमी यांनीही आपले वक्तव्य मागे घेत छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी मागितली तसेच औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा हेतू नव्हता आणि महापुरुषांचा अवमानही आपण केला नसल्याचा दावा आझमी यांनी केला.दरम्यान संसदीय कार्यमंत्री चंद्रकात पाटील यांनी याबाबत मांडलेला प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला आणि अबू आझमी यांचे बुधवारी अधिवेशनकाळापर्यंत निलंबन करण्यात आले आहे.