जळगाव जिल्ह्यातील २५० ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई ? !! जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीसा जारी !! ग्रामपंचायतीचे सदस्यही येणार अडचणीत !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
जळगाव विशेष (प्रतिनिधी) :-
२७ मार्च २०२५ गुरुवार
१५ वा वित्त आयोग तसेच ग्रामपंचायतीकडे असलेला निधी वेळेत खर्च करण्याचे आदेश देऊनही विलंब केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तब्बल २५० ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या असून संबंधित ग्रामसेवकांना तातडीने खुलासा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन न केल्यास या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे व यासाठी जिल्हा परिषद प्रशासना कडून ग्रामपंचातींना दि.७ एप्रिल पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.यात केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतींना थेट १५ व्या वित्त आयोगाचा निधी दिला जातो जेणेकरून गावांचा विकास हा गावपातळीवर होईल.मात्र काही ग्रामपंचायती हा निधी खर्च करत नसल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून २५० ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत तसेच त्यांच्याकडून खुलासा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यापैकी अजूनही काही ग्रामसेवकांकडून खुलासे प्राप्त झालेले नसल्याचे सांगितले जात आहे.
७५० पैकी २०० कोटींचा निधी अद्यापही अखर्चित !!
दरम्यान १५ व्या वित्त आयोगातून गेल्या तीन ते चार वर्षात जिल्ह्यातील १ हजार १५९ ग्रामपंचायतींना ७५० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून काही दिवसांपूर्वीच १५ व्या वित्त आयोगातून ३१ कोटींचा नवीन हप्ता देखील मिळाला आहे.यात ग्रामपंचायतींना मिळालेल्या ७५० कोटींच्या निधीपैकी २०० कोटींचा निधी अद्यापही अखर्चित असून अनेक ग्रामपंचायतींनी खर्चाची तरतूदच केलेली नसल्याची बाब समोर येत आहे.सदरहू २५० पैकी १५० ग्रामपंचातींनी १५ व्या वित्त आयोगातून ६० ते ६५ टक्क्यांपेक्षा अधिकचा निधी खर्च केलेला नाही.दरम्यान अशा ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना ग्रामपंचायतींचे दप्तर घेऊन थेट जिल्हा परिषदेत तपासणीसाठी बोलाविण्यात आले आहे. परिणामी दप्तर तपासणी दरम्यान काही तफावत आढळल्यास ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे सदस्यही यामुळे अडचणीत येणार आहेत.