“माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा” !! संजय राऊत यांचा कृषीमंत्र्यांवर हल्लाबोल !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०५ एप्रिल २५ शनिवार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावल्याचे पाहायला मिळाले असून नाशिक दौऱ्यावर असतांना एका शेतकऱ्याने कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला असता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उलट जाब विचारत त्या शेतकऱ्याला सुनावले असून ‘कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता,कर्जमाफीच्या पैशांनी काय करता ?’ असा जाब कोकाटे यांनी विचारला.दरम्यान कोकाटे यांच्या या विधानावरून खासदार संजय राऊतांनी त्यांना चांगलेच सुनावले असून ‘माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा आहेत’ असे म्हणत राऊतांनी कोकाटेंवर टीका केली आहे. “माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटते कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत.खरे म्हणजे माणिकराव कोकाटे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत व त्यांनी अशा प्रकारची विधाने करू नये व शेतकऱ्यांना दुखवणारी विधाने करू नये.अजित पवार यांनी प्रफुल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्या सारख्या लोकांना लगाम नाही घातला तर त्यांचे काही खरे नाही व या तिघांचे भाषण जर तुम्ही ऐकले तर कॉमेडी शो सुरु केलेले दिसत आहेत” अशा खोचक शब्दांत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना टीका केली आहे.
अजित पवार कॉमेडी शो करत आहेत असे नाही तर त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा कॉमेडी शो,दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रोज शेतकऱ्यांची टिंगल करतात,खिल्ली उडवतात.या राज्यात काय चालले आहे? आरोग्य विभागात काम व्यवस्थित सुरु नाही,कृषी खात्यात व्यवस्थित काम सुरु नाही. गृहखाते तर कोसळून गेले आहे” असे म्हणज संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की कर्जमाफी होऊ शकत नाही ? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही ? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला व या प्रश्नाचे उत्तर देतांना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या शेतकऱ्यालाच सुनावल्याचे पाहायला मिळाले.कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की,“मग जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरे कर्ज भरावे? कर्ज घ्यायचे आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची व तोपर्यंत कर्जभरायच नाही” असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले आहे.मला एक सांगा,आता येथे मीडिया आहे व मीडियासमोर असे बोलत नाही पण तुम्ही मला सांगा.तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचे तुम्ही काय करता ? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का ? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे.सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे,सिंचनासाठी पैसे,शेततळ्यासाठी पैसे देणार आहे.सरकार भांडवली गुंतवणूक करते मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का ? शेतकरी म्हणतात,पीक विम्याचे पैसे पाहिजे मग त्यातून साखरपुडे करा,लग्न करा” असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले आहे.