बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ एप्रिल २५ शुक्रवार
गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यामुळे सतत चर्चेत असून अशातच अंबाजोगाई तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.धक्कादायक बाब म्हणजे सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेली असून यात पाईपच्या माराने अंग काळनिळे पडल्याची माहिती समोर आली आहे.किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केल्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान सदरील घटनेतील पीडित महिलेने ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील लाऊडस्पिकर,पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या व यानंतर या वकील महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे.मारहाणीनंतर ही महिला बेशुद्ध देखील पडली होती व त्यानंतर तिला उपचारानंतर घरी पाठवल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.या मारहाणीनंतरचे फोटो देखील आता समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिल्यानंतर अंबाजोगाई तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणार्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण केली असून यात सदर महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुनही एका रात्रीतच उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.सदरहू सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणे कितपत योग्य आहे ? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल ? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे ? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत विचारला आहे.