अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मे २५ शनिवार
महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन सरकार मधीलच अनेक मंत्र्यांकडून आक्षेप घेतला जात असून लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीवर उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.यातच मंत्री संजय शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे दिल्याने सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर ते खाते बंद केले तरी चालेल असे म्हटले होते यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून ‘सरकारकडे पैसेच शिल्लक नाही व त्यामुळे अनेक योजनांची कामे ठप्प पडलेली आहेत.या सरकारने लोकांना हवेत बरीच स्वप्न दाखवली व ती आता यांना पूर्ण करता येत नाही त्यामुळे याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे अशा शब्दांत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ खात्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली असून ते म्हणाले की,’अर्थ खाते आपली मनमानी चालवत आहे तसेच लाडक्या बहिणीसाठी सव्वाचारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची मला कल्पनाही नाही.सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर ते खाते बंद केले तरी चालेल.’ यावरुन रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला असून रोहित पवार म्हणाले,अनेक योजनांची कामे ठप्प पडली आहेत.आज संजय शिरसाट बोलले उद्या अनेक मंत्री बोलतील.या सरकारमध्ये ताळमेळ नाही.शिरसाट यांच्या वक्तव्यावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात सर्व आलबेल नाही असे वाटते का ? असे विचारले असता रोहित पवारांनी म्हटले की,यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक वक्तव्य करायचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक वक्तव्य करायचे त्यामुळे त्यांच्यात वाद असल्याचे समोर आले होते.आता एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांबद्दल बोलत आहेत तर त्यांच्यात वाद आहेच असे म्हणणे वावगे ठरणार नाही.म्हणजे या सरकारमध्ये केवळ वादच आहेत असे रोहित पवार यांनी नमूद केले आहे.