राज्यभरातील स्पर्धेत यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा डंका !! शंभर दिवसीय कृती आराखड्यात राज्यात पटकावला प्रथम क्रमांक !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ मे २५ शुक्रवार
राज्य शासनाच्या शंभर दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमात येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने आपल्या कार्यक्षमतेने आणि समर्पणाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत एक ऐतिहासिक यश मिळवले आहे.आदिवासी विकासाच्या क्षेत्रात यावल प्रकल्पाचे हे यश म्हणजे एक आदर्श आणि प्रेरणादायी पाऊल आहे.राज्य सरकारने २०२५ च्या पूर्वार्धात एक महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून शंभर दिवसीय कृती आराखडा हाती घेतला.सदरील कृती आराखड्याअंतर्गत प्रशासकीय प्रक्रिया गतीमान करणे,सेवा प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शासकीय संस्थांचे कार्य आणि व्यवस्थापन सुधारून अधिक पारदर्शक व कार्यक्षम बनवणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांना आपापल्या कार्यक्षेत्रात निश्चित उद्दिष्टांची पूर्तता करणे अपेक्षित होते व यातून यावल प्रकल्प कार्यालयाने नेत्रदीपक कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.दरम्यान यावल प्रकल्प कार्यालयाने या उपक्रमासाठी विशेष नियोजन तयार करून कार्यांची अंमलबजावणी केली यातील काही प्रमुख कामगिरी पुढीलप्रमाणे आहे.यात प्रकल्प कार्यालय व शासकीय आश्रमशाळांचे सुशोभीकरण,शाळांमध्ये विद्यार्थी-केंद्रित,स्वच्छ व प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आले.१००% निर्लेखनाचे काम पूर्ण,जुने व अप्रासंगिक सामान,दस्ताऐवज यांचे निर्लेखन प्रभावीपणे केले गेले.कर्मचाऱ्यांची दुय्यम सेवा पुस्तके अद्ययावत करून सर्व नोंदी तपासून अद्ययावत करण्यात आल्या.सेवा सुलभिकरण,तालुका स्तरावर अर्ज वितरण व ऑनलाइन माहिती संकलन कार्य पद्धतशीरपणे राबविली गेली.ई-ऑफिस प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन,फायलींचा निपटारा जलदगतीने होऊ लागला.अभिलेख निंदनीकरण व वर्गवारी,सर्व कार्यालयीन अभिलेखांची रचना सुसंगत व व्यवस्थित करण्यात आली.दरम्यान प्रेरणादायी नेतृत्व आणि दिग्दर्शक हाताचा प्रभाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांना मिळालेले हे गौरवाचे यश म्हणजे केवळ प्रशासकीय कार्यकुशलतेचे नाही तर प्रभावी नेतृत्व व सुस्पष्ट मार्गदर्शनाचे फलित असल्याची भावना सर्वसामान्य वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
सदर उपक्रमात मा.ना.डॉ.अशोक उईके आदिवासी विकास मंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे धोरणात्मक दृष्टीकोन,मा.ना.गुलाबराव पाटील पालकमंत्री,जळगाव जिल्हा यांचे स्थानिक पातळीवरील सततचे सहकार्य तसेच विजय वाघमारे सचिव,आदिवासी विकास विभाग यांचे ठोस असे प्रशासनिक मार्गदर्शन सदर प्रकल्पासाठी आधारस्तंभ ठरले.त्याचप्रमाणे श्रीमती लीना बनसोड भा.प्र.से.,आयुक्त, आदिवासी विकास विभाग,नाशिक,आयुष प्रसाद भा.प्र.से.जिल्हाधिकारी जळगाव आणि मा.दिनकर पावरा,अपर आयुक्त,आदिवासी विकास विभाग नाशिक यांनी वेळोवेळी दिलेले सुस्पष्ट निर्देश, पाठपुरावा आणि प्रेरणा यामुळे प्रकल्पाचे काम अधिक गतीमान,प्रभावी आणि सुस्थित झाले.या सर्व मान्यवरांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलच्या वतीने त्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात येत आहे.ही संपूर्ण प्रक्रिया प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे राबवली गेली व त्यांना वरिष्ठांचे सक्षम मार्गदर्शन लाभले.तसेच भावी काळात भावी योजना अंतर्गत या यशाच्या जोरावर यावल प्रकल्प कार्यालयाने अधिक प्रभावीपणे पुढील कार्ययोजना तयार केली असून यात डिजिटल गव्हर्नन्सचा आणखी विस्तार, ऑनलाईन सेवांचा अधिक गतीमान व लाभार्थी-केंद्रित वापर,शाळा व वसतिगृहांचे शाश्वत विकास मॉडेल,पर्यावरणस्नेही,विद्यार्थी दृष्टिकोनातून शाळा विकसित करणे,कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण व कौशल्यविकास कार्यक्रम नवीन योजना आणि सेवांचा थेट लाभार्थ्यां पर्यंत पोहोच यासाठी स्थानिक सहभाग वाढवणे हे आहे.तर या यशामुळे यावल प्रकल्प केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवर ही आदर्श ठरू शकतो असा विश्वास व्यक्त होत आहे.हे यश म्हणजे एका टीमच्या सामूहिक प्रयत्नांची,लोकहिताच्या जाणिवेची आणि प्रशासकीय तत्परतेची साक्ष आहे.हे केवळ सन्मान नाही ही तर पुढील कार्याचा विश्वासार्ह आधार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी म्हटले आहे.