आगामी यावल नगरपालिका निवडणुकीत नवा चमत्कार घडण्याची चिन्हे !! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे प्रभाग क्रमांक ३ मधून पाणीपुरी विक्रेता राजेंद्र बारी उमेदवारी लढविणार !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ ऑक्टोबर २५ शुक्रवार
येथील नगरपालिका निवडणूक आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले असून आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छुकांच्या वतीने मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.दरम्यान नगरपालिका निवडणूक-२०२५ मध्ये नवा चमत्कार घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.यात अनेक इच्छुक उमेदवारांच्या वतीने आपण अमुक-अमुक ठिकाणाहून उमेदवारी लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.अशाच या मोर्चे बांधणीतून येथील पाणीपुरी विक्रेता राजेंद्र शामराव बारी यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक ३ मधून उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याची चर्चा चर्चिली जात आहे.
दरम्यान राजेंद्र बारी यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकातून उभा राहून लोकसेवेचा ध्यास घेणाऱ्या व्यक्तीचा नवा आदर्श यावल नगरपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.यात पाणीपुरी विक्रेता राजेंद्र शामराव बारी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे प्रभाग क्रमांक ३ मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची अधिकृत चर्चा सुरू झाली असून सामान्य व्यावसायिक असूनही समाजकारणाची ओढ आणि प्रामाणिक सेवाभाव यातून राजेंद्र बारी यांनी शहरात व परिसरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध,रोजच्या व्यवहारातली नम्रता आणि लोकांच्या अडचणीसाठी नेहमी धावून जाण्याची तयारी या गुणांमुळे त्यांचा प्रभाव जनमानसात वाढलेला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने स्थानिक नेतृत्वाकडूनही राजेंद्र बारी यांच्या उमेदवारी त्यांची जमेची बाजू ठरणार आहे.
यात राजेंद्र बारी यांच्या उमेदवारीस प्रभाग क्रमांक ६ मधून हिरवा कंदील देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा असून सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. परिणामी सर्वसामान्य माणूसही राजकारणात आपली छाप पाडू शकतो हा संदेश या उमेदवारीतून देण्याचा पक्षाचा मानस असल्याचे सांगितले जात असल्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिवसेनेच्या या उमेदवारीमुळे आगामी निवडणूक रंगतदार होणार आहे हे मात्र निश्चित !.तर नागरिकांमध्ये पाणीपुरी विक्रेता नगरसेवक बनणार का ? जनतेच्या मनातील जनसामान्यांचा उमेदवार म्हणून राजेंद्र बारी बाजी मारणार काय ? अशा विविध प्रश्नाची चर्चा चर्चिली जात असली तरी याचे उत्तर मात्र थेट निवडणुकीच्या निकालातूनच मिळेल एव्हडे नक्की !.