यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ ऑक्टोबर २५ रविवार
राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगररिषद,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका काँग्रेसने संघटनात्मक सज्जतेचा बिगुल वाजवला असून कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि ठोस रणनितीवर भर देत पक्षाने विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.यावल येथे आयोजित आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.अरिझ बेग मिर्झा यांच्या निरीक्षणाखाली आणि महासचिव तसेच रावेर-यावल मतदारसंघ प्रभारी डॉ.अरविंद कोलते यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडली.या बैठकीत यावल तालुका,यावल शहर आणि फैजपूर शहर काँग्रेस समित्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकी दरम्यान विभागनिहाय चर्चा,स्थानिक मतदारसंघांचा सखोल आढावा आणि मतदारांच्या अपेक्षांवर विचारमंथन करण्यात आले.कार्यकर्त्यांनी स्थानिक अडचणी,संधी आणि संघटनाच्या बळकटीसाठी आवश्यक उपाययोजना याबाबत आपल्या सूचना उत्साहाने मांडल्या.या चर्चेतून स्थानिक नेतृत्वाचा आत्मविश्वास आणि संघटनाची सुसंवादक क्षमता स्पष्टपणे जाणवली.प्रभारी डॉ.अरविंद कोलते आणि निरीक्षक अरिझ बेग मिर्झा यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की,“स्थानिक समित्यांना जमिनीच्या पातळीवर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की आघाडीतून याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून व मतदार संघाचे स्वरूप आणि संघटनेच्या सामर्थ्यानुसार घेतला जाईल.” त्यांनी यावल तालुका काँग्रेसने दाखवलेली शिस्त,एकजूट आणि सजगता यांचे कौतुक करत म्हटले की, “अशा प्रकारचे संघटनात्मक नेतृत्व हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीसाठी आदर्श उदाहरण ठरू शकते.”
या बैठकीस माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी,माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी,यावल पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी,कॉंग्रेस कमेटीचे यावल तालुकाध्यक्ष शेखर सोपान पाटील,माजी पंचायत समिती सदस्य विलास तायडे,फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख,काँग्रेस पक्षाचे यावल शहराध्यक्ष हकीम शेठ तसेच यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी,सुनिल फिरके,जावेद अली जनाब,कलीम खान,उमाकांत पाटील,राहूल मोरे,सतिश पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.