मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गेल्या दोन महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्या राजीनामा नाटय़ापासून राष्ट्रवादीत सुरू झालेल्या नाराजी नाटय़ाचा शेवट नुकताच अजित पवार यांच्या बंडाने झाला असून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचा शिंदे मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.अजित पवार यांनी विधानसभेत तिसऱ्यांदा तर एकूण पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.शिवसेनेपाठोपाठ वर्षभराच्या अंतरातच राष्ट्रवादीत फूट पाडण्यात भाजपला यश आले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुनरावृत्ती करीत आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा दावा अजितदादांनी केला आहे.या घडामोडींमध्ये महाविकास आघाडी कमकुवत करण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात धक्कादायक राजकारणाची पडलेली परंपरा कायम राहिली आहे.अजित पवार यांनी बंड करीत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले व लगेचच पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
२ मे २३ रोजी मुंबईत झालेल्या पुस्तक प्रकाशन समारंभात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती त्याची पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली.पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशी सर्व नेतेमंडळींनी विनंती केली होती तेव्हा पवारांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा अशी भूमिका मांडणारे अजित पवार एकमेव नेते होते.अजित पवार यांची कोंडी करण्याकरिताच पवारांनी ही खेळी केल्याचे मानले जात होते व कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पवारांनी राजीनामा मागे घेतला तेव्हाच राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले होते. त्यातच पक्षाच्या वर्धापनदिनी सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रभारीपदाची सूत्रे सोपविण्यात आली तेव्हाच अजित पवार पक्षातून बाहेर पडतील अशी अटकळ बांधली जात होती.शरद पवार यांचे राजीनामा नाटय़,सुप्रिया सुळे यांची राजकीय उत्तराधिकारीपदी निवड होणार याचे शरद पवार यांनी दिलेली स्पष्ट संकेत या साऱ्या राजकीय नाटय़मय घडामोडींचा शेवट अखेर अजित पवार यांच्या बंडाने २ जुलैला झाला.शरद पवार यांचे २ मेचे राजीनामा नाटय़ ते अजित पवार यांचे २ जुलैचे बंड याची परिणती राष्ट्रवादीतील फुटीत झाली.अजित पवार हे यांचे हे दुसरे बंड आहे.पहिले बंड शरद पवार यांनी मोठय़ा शिताफीने मोडून काढले होते मात्र दुसरे बंड मोडण्यात मोठे पवार यशस्वी होतात का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांचा भाजपबरोबर जाण्याकडे कल होता पण शरद पवार यांनी त्याला नकार दिला होता यातूनच अजित पवार,प्रफुल्ल पटेल,छगन भुजबळ आदी नेत्यांनी उचल खाल्ली आणि भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला सत्तेविना हे सारे नेते राहू शकत नव्हते हेच या बंडातून स्पष्ट होते.
राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी अजित पवार यांच्या बंडाला किती आमदारांची साथ आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही कारण पक्षात फूट पडल्याचा दावाच पवार यांनी केलेला नाही.शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेनेचा त्याग केलेला नाही फक्त नेतृत्व बदल केला असा दावा करीत आपलीच शिवसेना खरी असा युक्तिवाद केला होता तोच प्रयोग आता अजित पवार करीत आहेत.राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह हे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले यामुळे शरद पवार व अजित पवार यांना नेमके किती आमदारांचे पाठबळ आहे याची आकडेवारी स्पष्ट होऊ शकलेली नाही मात्र ४० पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार यांच्या गोटातून करण्यात येत आहे.अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्व साहजिकच कमी होणार आहे.राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचे पाठबळ मिळाल्याने भाजपप्रणीत सरकार अधिक भक्कम झाले आहे.अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सारेच मंत्री हे अनुभव संपन्न आहेत त्यांना सरकारच्या कामकाजाची बारीकसारीक माहिती आहे यामुळे शिंदे यांना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सांभाळण्याचे मोठे आव्हान असेल.शिंदे यांच्या समर्थक आमदारांचे लाड भाजपला पुरवावे लागत होते.राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे शिंदे यांच्या समर्थक आमदारांची भाजपला तेवढी आवश्यकता राहिलेली नाही.अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्याने आता शिंदे सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत.शिंदे व अजित पवार हे दोघेही अन्य पक्षांतील असल्याने देवेंद्र फडणवीस यांना सध्या तरी उपमुख्यमंत्रीपदी कायम ठेवून दोघांवर अंकुश ठेवला जाईल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे कि,देशभरातील विरोधी पक्षांची मोट बांधायला निघालेल्यांच्या पक्षाची बोट फुटली आहे. कोणाला गुगली टाकली तर कुणाला क्लीन बोल्ड केले म्हणणारेच कसे क्लीन बोल्ड झाले हिट विकेट झाले हे देशाने पाहिले आहे.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची भूमिका असून देशाला खंबीर नेतृत्व दिले आहे व जगभरात त्यांचा सन्मान होत आहे आम्ही शिवसेनेबरोबर गेलो तर भाजपबरोबरही जाऊ शकतो या निर्णयाला पक्षातील बहुतेकांचा पाठिंबा आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय राज्य व देशहिताचा आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.