पारोळा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-पारोळा तालुक्यातील बोरी नदीच्या काठावर वसलेल्या पिंप्री गावाला दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे.वर्षानुवर्षे मागणी करूनही पिंप्री ते मोंढाळे पूल होत नसल्याने गावातील शंभरवर विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट बिकट झाली आहे. पारोळा किंवा मांढोळा जाण्यासाठीचा रस्ता पाण्यामुळे बंद झाला आहे.त्यामुळे तब्बल १४ किलोमीटरचा फेरा पडत असल्याने अनेक विद्यार्थी गेल्या पंधरा दिवसांपासून शाळेत जाऊ शकलेले नाही.जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने नद्या,नाले ओसांडून वाहत आहेत. एकीकडे सिंचन व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी अनेक गावांमध्ये नदी व नाल्यांवर पूल नसल्याने तेथील ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे.काही ठिकाणी दुप्पट व तिप्पट अंतराचा फेरा पडत असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशाच प्रकारे पारोळा तालुक्यातील पिंप्री या दोन हजारावर लोकवस्ती असलेल्या गावाची परिस्थिती झाली आहे.याकरिता गावकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन पूल बांधण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
पिंप्री ता.पारोळा गावाला भेडसावीत असलेल्या प्रमुख बाबी-पिंप्री गावाला एका बाजूने बोरी नदी तर दुसऱ्या बाजूने ओसांडून वाहणारा नाला आहे.नाला व नदीला पाणी असल्याने गावाला पाण्याचा वेढा पडला आहे.गावाच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूला केटीवेअर बंधारे असल्याने तिकडेही पाणीच आहे.पिंप्रीच्या बाजूला हाकेच्या अंतरावर मोंढाळे गाव आहे.बोरी नदीला वर्षभर पाणी असल्याने तसेच गावालगत दोन केटीवेअर वर्षभर भरलेले असल्याने नागरिकांना ये-जा करता येत नाही.मोंढाळे जाण्यासाठी पिंप्रीच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पिंप्रीहून टोळी व टोळीहून मोंढाळे जावे लागते.पिंप्री-टोळी-मोंढाळे मार्गावर देखील कच्चा असल्याने तो वापरण्यासाठीही कसरत करावी लागते.तसेच
पिंप्री ते मोंढाळे या बोरी नदीवरील पूल तसेच पिंप्री-टोळी रस्त्याची शासनाकडे ग्रामस्थांकडून वर्षानुवर्षे केली जात आहे.मात्र या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पिंप्री येथिल ग्रामस्थांची व तेथील विद्यार्थ्यांची पारोळा व मोंढाळे शाळेत जाण्याची वाट बिकट झाली आहे. पारोळ्यापासून सात किलोमीटर अंतर असलेल्या गावाला आता पाण्यामुळे १४ किलोमीटरचा रस्ता पार करून जावे लागते.त्यामुळे ग्रामस्थांचे वावरणे मुश्किलीचे झाले आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कित्येक दिवस शिक्षणाला मुकावे लागत आहे.तरी सम्बंधित अधिकाऱ्यांनी तूर्त लक्ष पुरून पिंप्री गावाच्या समस्या सोडवाव्या अशी आग्रही मागणी गावकऱ्यांनी केली आहे.