यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २५ मंगळवार
तालुक्यातील अंजाळे येथील घाणेकर नगरमध्ये गोंधळाच्या कार्यक्रमाकरिता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पळाशी व अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली या गावातून दोन महिला आल्या होत्या. दरम्यान या महिला सोमवारी तापी नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी आणि अंघोळ करण्यासाठी गेल्या होत्या.यावेळी तापी नदीत असलेल्या एक डोहात पाय घसरून दोन महिला आणि एक बालक बुडाल्याने या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली असून या घटनेबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.प्रसंगी पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी मृतदेह यावल ग्रामीण भागात आणून तेथेच त्या तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून एकाच ठिकाणी या तिघांचा असा हृदयद्रावक मृत्यू झाल्यामुळे यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की.तालुक्यातील अंजाळे येथील तापी नदीच्या जवळ असलेल्या घाणेकर नगर येथील बादल लहू भिल यांच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होता.दरम्यान या गोंधळाच्या कार्यक्रमाकरिता वैशाली सतीष भिल वय २८ व त्यांचा मुलगा नकुल सतिष भिल वय ५ वर्ष रा.अंतुर्ली ता.अमळनेर आणि सपना गोपाल सोनवणे वय २७ राहणार पळाशी,ता.सोयगाव,जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे आले होते.यावेळी गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काल दि.१५ एप्रिल सोमवार रोजी दुपारी सव्वा बारा वाजता ते अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात घाणेकर नगर कंपनी जवळ आंघोळ आणि धुणे धुण्यासाठी गेले होते.दरम्यान या नदीपात्रात एका डोहात तिघे बुडाले व ते पाण्यात बुडाले याची माहिती मिळताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.यावेळी यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख,हवालदार अर्षद गवळी,इस्तीयाक सय्यद,अनिल पाटील,उमेश महाजन घटनास्थळी दाखल झाले तसेच या तिघांचे मृतदेह तेथुन काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी शव विच्छेदन करीत मृतदेह रात्री आठ वाजता त्यांच्या कुटुंबाला सोपवण्यात आले.या घटनेमुळे यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.