बाळासाहेब आढाळे
मुख्य संपादक पोलीस नायक न्यूज
महाराष्ट्र राज्य हि साधुसंतांची व सज्जनांची कर्मभूमी आहे.राज्यात आजही प्रसिद्धीपासून लांब राहून आपले कार्य करणारी ज्ञात अज्ञात पवित्र व जागृत देवस्थाने आहेत.त्यापैकीच एक म्हणजे यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य,पुरातन व अध्यात्मिक असे श्रीपंतमंदिर आनंदवन श्री क्षेत्र डोंगरदे येथील देवस्थान होय.येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही दि.३ व ४ फेब्रुवारी रोजी वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यानिमित्त दि.३ फेब्रुवारी २३ शुक्रवार रोजी दुपारी तीन ते सहा पालखी महोत्सव व दि.४ फेब्रुवारी २३ शनिवार रोजी महामंडलेश्वर श्री.जनार्दन हरीजी महाराज (फैजपूर),महामंडलेश्वर श्री.श्री.पुरुषोत्तम दासजी महाराज (खंडेराव महाराज देवस्थान फैजपूर),श्री.गोपाळ चैतन्यजी महाराज (वृंदावन धाम पाल),महंत कृष्णगिरीजी महाराज(सावदा),खानदेश रत्न शास्त्री भक्ती किशोरदासजी(स्वामीनारायण मंदिर सावदा),महानगर सुरेश शास्त्री मानेकर बाबा(श्रीकृष्ण मंदिर सावदा) या संतांची उपस्थिती लाभणार आहे.सदरील संत महात्मा मंडळींच्या उपस्थितीत विविध उपक्रमाचे आयोजन उत्सव प्रसंगी करण्यात येणार आहे.तर दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत प्रदीप जगन्नाथ कोलते व साधना प्रदीप कोलते (डोंगरकठोरा,ह.मु. भुसावळ) यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त व अवधूत संप्रदायातील भक्त गणांनी सदरील उत्सव महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीपंतमंदिर आनंदवन श्री क्षेत्र डोंगरदे येथील महंत स्वरूपानंद महाराज व विश्वस्त मंडळी यांनी केले आहे.
*श्रीपंतमंदिर आनंदवन श्री क्षेत्र डोंगरदे बाबत आख्यायिका *
डोंगर कठोरा ता.यावल जि.जळगाव या गावापासून सुमारे चार कि.मी.अंतरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पुरातन काळापासून डोंगरदा नावाचे गाव आहे.या गावावर परकीय अंमलाच्या काळात वेळोवेळी हल्ले होत असल्याने तेथील लोकांनी स्थलांतर केले त्यामुळे सन १९५७ मध्ये हे गाव ओसाड म्हणून गणले जात होते.त्याबाबतची ओळख म्हणून आजही येथे दैवी तसेच चमत्कारिक अशी “पायविहीर”अस्तित्वात आहे.सदरील पायविहीर हि सिद्ध व जागृत म्हणून ओळखली जाते.या पायविहिरीबाबत अशी आख्यायिका आहे कि,प्रभू रामचंद्र वनवासात असतांना ह्या भागात आलेले होते त्यावेळी त्यांना तहान लागली असतांना तहान भागविण्याकरिता त्यांनी बाण मारून हि विहीर निर्माण केलेली आहे.त्यामुळे हि मानवनिर्मित विहीर नसून सिद्ध व जागृत पायविहीर म्हणून या विहिरीकडे मनोभावे आजही पहिले जाते.कालांतराने भक्तांनी या विहिरीला पायऱ्या बांधल्या त्यामुळेच या विहिरीला “पायविहीर”असे नाव पडले.भाविक भक्त आपली इच्छा पूर्ण करण्याकरिता याठिकाणी येत असत.प्रसंगी भोजनाचेआयोजन करीत असत(खान्देशात याला मान देण्याचा कार्यक्रम म्हटले जाते).या कार्यक्रमप्रसंगी लागणारी आवश्यक भांडी व पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या सिद्ध पायविहिरीस प्रार्थना केली असता हि विहीर स्वयंपाकाकरिता संपूर्ण भांडी देत असे.तसेच हि विहीर आपल्या पाण्याची पातळी एव्हढी वाढवीत असे की विहिरीतून हाताने पाणी घेता येत असे मात्र कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाकरिता विहिरींकडून मिळालेली संपूर्ण भांडी साफसूफ करून पुन्हा मनोभावे प्रार्थना करून या विहिरीच्या काठावर ठेवावी लागत असत व भांडी पुन्हा विहिरीत आपोआप गडप होत असत.म्हणूनच जागृत अशी हि सिद्ध व जागृत पायविहीर पाण्याने तुडुंब भरून वाहू लागली कि त्यावर्षी हंगाम भरभरून येत असे आजही डोंगर कठोरा येथील लोक या अख्यायीकेस मानतात.मागील काळात दृष्ट लोकांनी या विहिरीतून देण्यात आलेल्या भांड्यांची चोरी केली तेव्हापासून या विहिरीतून भांडे मिळणे बंद झालेले आहे.परंतु आज या पायविहिरीतुन प्रत्यक्षात भांडी मिळत नसली तरी या पायविहिरीचे सत्व कायम आहे.याचा मंदिरातील व डोंगर कठोरा गावातील जुन्या मंडळींना अनुभव आहे.सन १९६२ साली उत्सव समयी पाण्याची गरज असतांना पायविहीर मात्र कोरडी होती.परंतु पायविहिरीच्या वरील आख्यायिकेनुसार प.पु.कृष्णाआईंनी विहिरीला मनोभावे नवस केला कि’हे माते आमच्या उत्सवाला पाणी दे,आम्ही तुझी खण व नारळाने ओटीभरण करू’हि घटना माद्य शुद्ध एकादशीची आहे.व काय आश्चर्य त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच द्वादशीला विहिरीला भरपूर पाणी आहे त्यावर माद्य शुद्ध त्रयोदशीला श्रीक्षेत्र स्थापनेचा उत्सव यथासांग पार पडला.नंतर माघ वद्य द्वितीयेला विहीर पहिल्याप्रमाणे कोरडी झाली.आजही श्रीगुरु पालखीच्या वेळेस पालखी थांबवून पायविहिरीचे ओटीभरण केले जाते.अशा ह्या पवित्र व इतिहास असलेल्या स्थानाचे नंतर पुनरुज्जीवन करण्यात आले.
श्रीमद भागवत गीतेतील श्री भगवंतांच्या व साधुसंतांच्या धर्मरक्षणासाठी मी जन्म घेईल या वचनोक्तीप्रमाणे श्री अवधूत संप्रदायाचे प्रचारक प.पु.श्रीकृष्णाजी बिंदुमाधव बापट उर्फ श्री बापट महाराज हे आपल्या अवधूत संप्रदायाच्या प्रचारकरिता खान्देशात आलेले होते.यावेळी ते डोंगर कठोरा येथील त्यांचे शिष्य राघो खुशाल ठोंबरे(काळूबुवा)यांच्याकडे आले असतांना त्यांच्या शिष्यांच्या वतीने श्रीक्षेत्र डोंगरदा येथे सन १९५८साली पायविहिरीजवळ वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.यावेळी मध्यान्हसमयी बापट महाराज प्रफुल्लित होऊन औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ झाले.त्यावेळी त्यांना खडावांचा आवाज ऐकू येऊन श्री.दत्तात्रयांचे तेजोमय दर्शन झाले.सदरील अनुभव बापट महाराज यांनी आपल्या शिष्याना सांगितली.अशाच प्रकारची चमत्कारिक घटना सन १९५९ साली त्याच ठिकाणी,त्याच मितीला व त्याच समयी बापट महाराज यांना श्री दत्तगुरूंचे दर्शन होऊन झाली.दोन वेळेस घडलेल्या या अनुभवामुळे येथे श्रीदत्ताचे जागृत स्थान आहे हे बापट महाराजांनी जाणले.बापट महाराजांनी आपला अनुभव आपल्या शिष्याना सांगून त्याठिकाणी श्री दत्तगुरूंच्या पादुका व मूर्ती स्थापनेचा मनोदय व्यक्त केल्यानुसार भक्तांच्या प्रतिसादातून सन १९६० मध्ये निर्गुण,निराकार श्रीदत्तपादुका अवधूत सांप्रदायिक पद्धतीने माद्य शुद्ध त्रयोदशीला स्थापन करून श्रीदत्ताचे भव्य असे मंदिर बांधले.तेव्हापासून बापट महाराज यांनी खान्देशात डोंगरदा येथे अवधूत संप्रदायाचा झेंडा रोवला.हि परंपरा आजही भाविक भक्तांच्या माध्यमातून चालू ठेवण्याचे कार्य केले जात आहे.
दत्तावतारी श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांना त्यांच्या श्रीगुरूंकडून मिळालेल्या संगमरवरी पादुका,श्रीगुरुदीक्षांत दंड व माळ हा श्रीगुरुघराण्यातील ऐवज त्यांच्या लिखाणानुसार श्री बापट महाराजांना इ.स.१९३९ मध्ये श्रीपंताष्टमीला श्रीपंत मातोश्री व सर्व श्रीपंत बंधू यांचेकडून अर्पण करण्यात आल्या.त्याचवेळी अवधूत संप्रदायाबद्दलची सनद आजही श्रीक्षेत्री ठेवण्यात आलेली आहे.सन १९६० सालापासून आजपावेतो दरवर्षी त्रयोदशी ते गुरुप्रतिपदेपर्यंत श्रीक्षेत्र डोंगरदा येथे उत्सवाचे आयोजन करण्यात येते.’वचनाचा अनुभव घेईन पदरी’या उक्तीनुसार बापट महाराज्यांच्या सांगण्यावरून बावीस फूट खोलीवरच झरे वाहू लागले.या खोदकामात निघालेली माती बांधकामाच्या चुन्याप्रमाणे पांढरी स्वच्छ व मऊ होती व हि बाब सातपुड्याच्या पायथ्याच्या खडकाळ भागात अचंब्याचीच होती.या विहिरीचे बापट महाराज यांनी “भागीरथी विहीर”असे नामाभिकरण केलेले आहे.काही वर्षांपूर्वी सरकारी भूसर्वेक्षण करणाऱ्या मंडळींनी या भागिरथी विहिरीची पाहणी केली असता ,’ह्या भागात स्वच्छ,गोड व थंडगार पाणी असलेली विहीर आहे असे आम्हाला कोणी सांगितले असते तर त्याला आम्ही वेड्यात काढले असते कारण आमच्या सर्वेक्षणानुसार ह्या भागात कोठेच पाणी नाही असा निष्कर्ष निघतो.
श्रीक्षेत्री दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढू लागल्यामुळे लोकशाही पद्धतीनुसार कायद्याचे बंधन असणे आवश्यक होते त्यासाठी बापट महाराजांनी १९७० साली महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विश्वस्त कायद्यानुसार श्रीपंत मंदिर आनंदवन श्रीक्षेत्र डोंगरदा ह्या नावाची संस्था स्थापन केली.तेव्हापासून घटना व नियम यांना अनुसरून संस्था कार्यभार सांभाळत आहे.सदरील संस्थेला उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा उत्सव व श्रीक्षेत्राची वाढ कशी करावी असा प्रश्न विश्वस्थांपुढे होता हा प्रश्न सुटावा म्हणून श्री बापट महाराजांचे आज्ञेनुसार तसेच सांप्रदायिक पद्धतीनुसार ज्या गावी महाराज्यांचे शिष्य गण आहेत त्या प्रत्येक गावातून उत्सवापूर्वी साधारण एक महिना आधी भिक्षाफेरी काढली जाते.या भिक्षाफेरीत शिष्यांकडून तसेच भाविक भक्तांकडून मिळणारी धान्यभिक्षा व रोखीच्या रूपात मिळणारी आर्थिक मदत ह्यांच्या सहाय्याने उत्सव साजरा केला जातो.