Just another WordPress site

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी ॲड.उज्जवल निकम यांची नियुक्ती !!

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२६ फेब्रुवारी २५ बुधवार

मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून या संदर्भातील अधिसूचना निघाल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी माध्यमांना दिली आहे.या अधिसूचनेनुसार ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर अ‍ॅड.बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.मागील महिना ते दीड महिन्यांपासून या प्रकरणात ॲड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी पुढे येत होती व याच प्रमुख एका मागणीसाठी मंगळवारपासून मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच ॲड.निकम यांच्या नियुक्तीच्या संदर्भाने अधिसूचना निघाली आहे.

“मी विरोधकांच्या आरोपांना…” उज्ज्वल निकम यांचा पलटवार !! संतोष देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य !!

“माझी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो.काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले की,सदर खटला चालविण्यासाठी मी तयार आहे व त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तसे आदेश दिले आहेत.मस्साजोगच्या रहिवाशांनी उपोषण सोडावे असे मी आवाहन करतो.या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे.प्रकृतीला त्रास होईल असे कोणतेही कृत्य कुणीही करू नये.या खटल्यात पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताच आम्ही तातडीने हा खटला चालिवण्यास घेऊ अशी प्रतिक्रिया वकील उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर माध्यमांशी बोलतांना दिली.यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिले.

“माझ्या नियुक्तीनंतर राजकीय पडसाद उमटतील याची मला आधीच कल्पना होती.मुख्यमंत्र्यांनाही हे मी सांगितले होते.यापूर्वीही विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आणि आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला सांगितले.मी राजकारणात कधीही सक्रिय नव्हतो.राजकारणात आता आलो असलो तरी माझ्या कर्तव्यात कधीही,कुणीही आडवे येऊ शकत नाही त्यामुळे मी त्याच जोमाने या प्रकरणात लक्ष घालेल असेही वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.मस्साजोग ग्रामस्थानी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. “बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर अ‍ॅड.बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे”असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.बीड जिह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावात पवनऊर्जा प्रकल्प राबविणाऱ्या आवादा कंपनीकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नातून गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृणपणे हत्य करण्यात आली होती व यानंतर बीडसह राज्यभरात आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने सात आरोपींना ताब्यात घेतले तसेच घटनेच्या तब्बल २० दिवसांनी संशयित आरोपी वाल्मिक कराडने पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.आठ आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.हत्येमधील कृष्णा आंधळे नामक आरोपी अद्यापही फरार आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अन्नत्याग आंदोलनाला यश !! देवेंद्र फडणवीसांनी मान्य केली ‘ही’ मागणी !!

Santosh Deshmukh Murder Case

बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी आदी प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मागील आठवड्यात देण्यात आला होता.त्यानुसार राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक मागणी मान्य केली आहे.संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात वृत्त दिले.“बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर अ‍ॅड.बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता एसआयटी,सीआयडीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल.कुठे काही उणिवा वाटत असतील तर मदत होईल व जी चौकशी सुरू आहे त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो.लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे यासाठीही सरकारी वकिलांचा उपोयग होणार आहे अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे धाकडे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे.

वडिलांना न्याय मिळणे महत्त्वाचे !!

तर आज आमची एक मागणी मान्य केली असून इतर मागण्याही मान्य कराव्यात अशी अपेक्षा आहे.आम्हाला न्याय मिळण्यासाठी जे करणे शक्य आहे ते मी करणार आहे कारण माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते व त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही.एकीकडे मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर दुसरीकडे मला परीक्षाही द्यायची आहे.दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत पण त्याहीपेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणे मला जास्त महत्त्वाचे वाटते अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या मुलगी वैभवी देशमुख हिने दिली.

उज्ज्वल निकम यांची कारकीर्द !!

निकम यांनी जळगाव जिल्ह्यातून वकिलीला सुरुवात केली.सरकारी वकील म्हणून त्यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारची बाजू मांडली व या प्रकरणापासून ते नावारूपास आले त्यानंतर १९९७ साली टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार आणि २००६ साली भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणातही उज्ज्वल निकम यांनीच सरकारची बाजू मांडली होती.उज्ज्वल निकम यांनी आपल्या कारकिर्दीत ३० आरोपींना फाशीची शिक्षा आणि ६०० हून अधिक आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असे ते अभिमानाने सांगतात यापैकी फाशीच्या काही शिक्षांना वरच्या न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.२००६ साली गाजलेल्या खैरलांजी प्रकरणातही निकम यांनी सरकारची बाजू लढविली होती.भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली ज्यामध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांना गावात फिरवले गेल्याचाही आरोप होता यानंतर शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण तसेच कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरणातही त्यांनी बाजू मांडली होती.

पण मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा मिळवून दिल्यानंतर उज्ज्वल निकम यांचे नाव घराघरांत पोहोचले.या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना उज्ज्वल निकम यांनी केलेली अनेक भाषणे गाजली तसेच तुरुंगात अजमल कसाबकडून बिर्याणीची मागणी झाल्याचेही ते म्हणाले होते पण त्यानंतर त्यांनी हे विधान लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केले असल्याचे म्हटले.मागच्या काही वर्षांत उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून मोठ्या केसेस हाती घेतल्या नव्हत्या तर काही खटल्यांतून त्यांनी अर्ध्यातूनच माघार घेतली होती.२०११ साली मुंबईत झालेला तिहेरी बॉम्बस्फोट आणि २०१४ साली पुण्यात मोहसीन शेख नामक तरुणाची झालेली हत्या या प्रकरणाची सुनावणी त्यांनी अर्ध्यातूनच सोडली.२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी २९ प्रकरणांतून काढता पाय घेतला होता.अनेक दहशतवादी प्रकरणांत त्यांनी आरोपीला शिक्षा मिळवून दिली असल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उज्ज्वल निकम यांची देशभक्त अशी प्रतिमा दाखवली गेली.उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांचा तब्बल १६,५४१ मतांनी पराभव झाला.

“अन्नत्याग आंदोलनानंतर सरकारला…” !! बीड हत्याप्रकरणात उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर अंजली दमानियांचे वक्तव्य

Anjali Damania

बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या ग्रामस्थांचे २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन चालू आहे.दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी यासह इतर काही मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन चालू आहे.त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांची केवळ एक मागणी मान्य केली आहे.संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.दिवंगत संतोष देशमुख यांचे भाऊ व आंदोलनकर्ते धनंजय देशमुख याबाबत म्हणाले,“या हत्याप्रकरणी तपास करण्यासाठी जी एसआयटी नेमली आहे,सीआयडीचे जे पथक तपास करत आहे त्यांना उज्ज्वल निकम यांची मदत होऊ शकते.या प्रकरणात कुठली उणीव असेल तर ती उज्ज्वल निकयम त्यांच्यामार्फत दूर होऊ शकते.या प्रकरणी लवकरच प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार आहे त्यामध्ये उज्ज्वल निकम यांची भूमिका महत्त्वाची राहील”.

दरम्यान, भाजपा आमदार सुरेश धस यांनी या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.धस म्हणाले,“फडणवीस या प्रकरणी पहिल्यापासूनच सकारात्मक होते व त्यांनी माझ्या मागणीनंतर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.त्याचबरोबर मी उज्ज्वल निकम यांनी हा खटला स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो.मला आता आशा आहे की या प्रकरणातील आरोपी फासावर लटकवले जातील.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या,“धनंजय देशमुख व मस्साजोगच्या ग्रामस्थांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यातली केवळ एक मागणी आता मान्य झाली आहे परंतु त्यासाठी त्यांना अन्नत्याग आंदोलन करावे लागले ही खूपच दुर्दैवी बाब आहे.अन्नत्याग आंदोलन करून देशमुख कुटुंब व मस्साजोगच्या ग्रामस्थांनी ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी एक मागणी होती की हा खटला उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवावा.आंदोलन केल्यानंतर ही मागणी मान्य केली गेली.हे देशमुख कुटुंब,मस्साजोगचे ग्रामस्थ व आपल्या सर्वांचे दुर्दैव आहे.या गोष्टी तातडीने व्हायला हव्या होत्या.या प्रकरणी एसआयटी नेमणे असेल,सीआयडीकडे तपास सोपवणे असेल या सगळ्या गोष्टींना दोन-दोन तीन-तीन महिने लावले हे सगळे वाईट आहे.सरकारने असे करू नये.न्याय हा सर्वांसाठी समान असायला हवा”.

 

Leave A Reply

Your email address will not be published.