राज्यातील पाच लाख महिला अपात्र !!

राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेणाऱ्या पाच लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरवले आहे व त्यांच्याकडून सहा महिन्यांच्या अनुदानाची प्रत्येकी नऊ हजार रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया यापुढेही चालू राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.दरम्यान यापूर्वी राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी जानेवारीमध्ये उत्पन्नात वाढ झाली असेल,अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल,कुटुंबात चारचाकी असलेल्या महिला,आंतरराज्य विवाह केलेल्या महिला यासह आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरणार असल्याचे स्पष्ट केले होते.