मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.हाता तोंडाचा घास पावसात वाहून गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दि.२३ रोजी स्वतः मराठवाडयाच्या दौऱ्यावर येत आहेत.औरंगाबाद येथील गंगापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत.या भागातील शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार आहे तसेच त्यांच्या व्यथा देखील जाणून घेणार आहे.गंगापूर तालुक्यातील दहेगाव,पेंढापूर या दोन गावातील नुकसानीची पाहणी ते करतील विशेष म्हणजे राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच दौऱ्यावर आहेत.
दरम्यान औरंगाबाद हा खरे तर शिवसेनेचा बाल्लेकिला मानला जातो परंतु शिवसेनेत जी काही बंडाळी झाली त्यामध्ये औरंगाबादमधीलच जास्त आमदार शिंदे गटात गेलेले आहेत त्यामुळे बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.आता राज्यातील सरकार कोसळल्या नंतर उद्धव ठाकरे प्रथमच औरंगाबादला जात असून त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.