Just another WordPress site

अडचणीवर मात करीत स्वप्न साकारण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही !! तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांनी जिद्दीने यश संपादन करावे !! गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांचे प्रतिपादन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०६ फेब्रुवारी २६ शुक्रवार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि ती साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे.ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा मिळवताना अनेक अडचणी येतात मात्र या अडचणींवर मात करून योग्य पात्रता धारण करण्यासाठी केवळ अभ्यासाचाच मार्ग स्वीकारावा लागेल.प्रामाणिक कष्टाचे फळ नक्कीच मिळते असे प्रतिपादन यावल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले आहे.येथील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

“आईच्या स्मृती जपण्यासाठी अनोखा सन्मान”

विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक प्रशांत सोनवणे यांनी आपल्या मातोश्री स्व.लतिका सुरेश सोनवणे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ एक प्रेरणादायी उपक्रम राबवला.विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गातील प्रथम क्रमांक मिळवणारे आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या एकूण २५ गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहित केले व या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या आई-वडिलांचाही यावेळी गौरव करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

दरम्यान प्रमुख मार्गदर्शक प्रमोद राणेराजपूत,समाज कल्याण उपायुक्त यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहून ध्येय निश्चित करावे व मोबाईलवरील रिल्स पाहण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याचा चांगल्या कामासाठी वापर करावा तसेच मी पुस्तकांशी मैत्री केल्यामुळेच आज हे यश मिळवू शकलो असे सांगितले.तर प्रमोद वाघ सपोनि,अडावद यांनी मनोगतातून “मुलांनी गट (Group) करून अभ्यास करावा तसेच पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये जिद्द निर्माण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रमोद वाघ यांनी मार्गदर्शन केले.सोबत त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान घेण्याचेही मागर्दर्शनातून सांगितले.विनायक तेली,सेवानिवृत्त प्राचार्य) यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात शिस्तीचे महत्त्व किती मोठे आहे यावर मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश चौधरी होते तर व्यासपीठावर सचिव जगन्नाथ कोळी,प्राचार्य देविदास मोरे,सेवानिवृत्त प्राचार्य विनायक तेली,यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नवनियुक्त उपायुक्त प्रमोद राणे राजपूत आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय गोसावी यांनी केले तर आभार सुनील पाटील यांनी मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका आणि कर्मचारी वृदांने विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला चुंचाळे परिसरातील पालक,ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.