छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिरात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून २९०० लाभार्थ्यांना ४३५० लाभाचे वाटप !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ जुलै २६ शुक्रवार
महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख व जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने ११ रावेर विधानसभा मतदारसंघाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ काल दि.३० जुलै २६ गुरुवार रोजी शुभदिव्य कार्यालय फैजपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.या भव्य शिबिराच्या अध्यक्षस्थानी अमोल जावळे आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ आणि नंदकिशोर महाजन जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदार संघ आमदार हे उपस्थित होते.यावेळी उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग बबन काकडे,तहसीलदार यावल मोहनमाला नाझिरकर आणि तहसीलदार रावेर दीपा जेधे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.याशिवाय यावल तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७ विभागांचे २० स्टॉल …. शासनाच्या योजना एकाच छताखाली
शिबिरामध्ये महसूल,ग्रामविकास,कृषी,सामाजिक न्याय,दिव्यांग कल्याण,शिक्षण,आरोग्य,पंचायत राज,महिला व बालविकास,रोजगार हमी,बँकिंग,विधी सेवा प्राधिकरण आदी १७ शासकीय विभागांचे एकूण २० माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते.प्रत्येक स्टॉलवर योजनांची सविस्तर माहिती देणारे आकर्षक बॅनर, फ्लेक्स व माहितीपत्रके उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामुळे नागरिकांना विविध योजनांची माहिती,मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष लाभ एकाच ठिकाणी मिळाला.
२९०० उपस्थित लाभार्थ्यांना ४३५० प्रत्यक्ष लाभाचे वाटप
या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला.नागरिकांच्या सोयीसाठी विविध विभागांनी तत्काळ सेवा,प्रमाणपत्रे, मंजुरी आदेश,लाभवितरण तसेच मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
२६ गरजू कुटुंबांना मालकी हक्काचे ७/१२ वितरित
शिबिरातील विशेष आकर्षण म्हणजे मौजे रोजोदा येथील १७ गरजू बेघर लाभार्थी व पात्र शेतकरी कुटुंबांना शासनाच्या १,५०० व ३,००० चौरस फूट भूखंडांचे वितरण करण्यात आले.
विविध योजनांचे लाभ वितरण
शिबिरामध्ये खालील महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला यात महिलांना शेतकरी दर्जा देणे प्रमाणपत्र,लक्ष्मी मुक्ती योजना सातबारा वाटप,कुंभार समाजातील लाभार्थ्यांना ओळख प्रमाणपत्र वाटप,कौटुंबिक वाटणी नोंदणी फी माफ प्रकरणे,प्रधानमंत्री आवास योजना,घरकुल योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना,शिष्यवृत्ती योजना,दिव्यांग कल्याण योजना,विविध सामाजिक सुरक्षा योजना,महसूल विभागाच्या विविध सेवा,जिवंत सातबारा मोहीम 7/12 वाटप,बळीराजा शेतपानंद रस्ते योजना तसेच इतर शासकीय विभागांच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला.
“शासनाच्या लोकाभिमुख कार्यक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करावी “- अमोल जावळे आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ
” आदरणीय महसूल मंत्री महोदय यांनी या दिवसांमध्ये शेतकऱ्यांशी संबंधित महत्वाच्या तीन ते चार योजना अमलात आणल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना त्याचा निश्चितच फायदा होत आहे”- नंदकिशोरजी महाजन विधान परिषद आमदार
लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती
या जनकल्याणकारी अभियानास व महसूल समाधान शिबिरास नगराध्यक्ष नगर परिषद फैजपूर श्रीमती दामिनी सराफ तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते,प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार बांधव,विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला तसेच शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक केले.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेत प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी फैजपुर बबन काकडे यांनी केले.त्यांनी शिबिराच्या उद्दिष्टांची माहिती देत,विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार यावल मोहनमाला नाझीरकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर आर आर राजपूत यांनी केले.
लाभार्थ्यांकडून प्रशासनाचे कौतुक
शिबिरात उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.एकाच ठिकाणी अनेक विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्याने वेळ,श्रम व खर्चाची मोठी बचत झाल्याचे सांगत त्यांनी शासन व जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
शासन आपल्या दारी-सेवा आपल्या हक्काची
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचल्या असून लोकाभिमुख, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाची प्रचिती या शिबिरातून नागरिकांना आली.