यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
अपघातात मयत झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चक्क त्याचा मृतदेह थेट यावल पोलीस स्थानकात आणल्याने येथे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्मित झाले होते.ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने अखेर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पार्थिव घरी नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,अरूण किशोर भालेराव व त्याचा मित्र विजय संजय इंगळे हे दोन्ही १० जानेवारी रोजी दुचाकीने कोरपावली येथून यावलला येत असतांना विरावली गावाजवळ त्यांना खलील रफीक तडवी रा.कोरपावली ता.यावल यांनी ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते.यातील अरूण किशोर भालेराव हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते मात्र अखेर त्याने काल दि.२१ रोजी शेवटचा श्वास सोडला.दरम्यान याप्रकरणी ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीसाठी मयत अरूण भालेराव यांच्या नातेवाईकांनी त्यांचे पार्थिव घेऊन थेट यावल पोलीस स्थानक गाठले त्यामुळे पोलीस स्थानक परिसरात काही काळ गोंधळ उडाला.याबाबत पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी मयताच्या आप्तांशी संवाद साधत या प्रकरणी आधीच नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झालेली असून आता यापुढील गुन्हा हा यावल येथे दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले.त्यानुसार संबंधीत ट्रॅक्टर चालक खलील रफीक तडवी रा.कोरपावली,ता.यावल याच्या विरोधात भादंवि कलम ३०४ (अ); २७९; ३३७;४२७,मोटार वाहन कायदा १८४,१३४ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.त्यामुळे अखेर मृताच्या आप्तांनी पार्थिव घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.