Just another WordPress site

समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन वेगळा संदेश देऊया… जितेंद्र आव्हाड यांचे प्रकाश आंबेडकरांना पत्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.५ मार्च २४ मंगळवार

महाविकास आघाडीने बोलावलेल्या बैठकींना जाऊ नये असा आदेश वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत यामुळे महाविकास आघाडीत फुट पडल्याचे चित्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिले असून त्यात समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन वेगळा संदेश देऊया… असे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिले असून या संबंधीचे संदेश त्यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.शिव,फुले,शाहू,आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम,आपुलकी,माया निर्माण व्हावी यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो.मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत.महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत त्यातील महत्वाचे नेते म्हणून म्हणजेच आपणाकडे पाहिले जात आहे असे आव्हाड यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच आपणाकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे व या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी एकच विनंती करू इच्छितो की,तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करणे.त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे.आपणही याच विचारांचे आहात.संविधान आणि लोकशाही हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे.जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.