“संविधानावर चालणाऱ्या देशाचे हिंदूराष्ट्र निर्माण करायचे हीच भाजप आणि ‘आरएसएस’ची मनीषा” !! कॉ.प्रकाश कारत यांची टीका
आपल्या भाषणात कारत म्हणाले,लोकसभा निवडणुकीत देशभरात धर्मनिरपेक्ष,लोकशाहीवादी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक मंच उभा केला व त्याला चांगले राजकीय यश मिळाले तसेच भाजपला स्पष्ट बहुमत गाठता आले नाही.चारशेपेक्षा जास्त जागा मिळवल्यानंतर देशाचे संविधान बदलणे आणि हिंदूराष्ट्र निर्माण करणे हीच या लोकांची मनीषा होती.आताही धार्मिक ध्रुवीकरण करून हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात असून बड्या भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे.सर्वच केंद्रीय यंत्रणांचा प्रचंड प्रमाणात गैरवापर केला जात आहे.विरोधकांना तुरुंगात टाकायचे काम सुरू आहे.देशात जिथे भाजपशासित राज्य सरकारे आहेत अशा ठिकाणी धार्मिक उत्सवांचा गैरवापर केला जात आहे अशी टीकाही यावेळी कारत यांनी केली.भारतीय जनता पक्षाला हरवायचे असेल तर देशभरात डाव्यांची ताकद वाढायला हवी व जोवर डाव्या पक्षांचा जनाधार वाढणार नाही तोवर हिंदुत्ववादी शक्तींशी संघर्ष करता येणार नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.राज्य सचिव उदय नारकर यांनी भाजप आणि ‘आरएसएस’ला मनुवादी विचारसरणीच्या आधारे हिंदूराष्ट्र प्रस्थापित करायचे आहे त्यामुळे देशातील लोकशाहीवादी नागरिकांना संविधान वाचवण्याची लढाई आता लढावी लागेल असे प्रतिपादन केले.परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीला उध्वस्त करण्याचे कारस्थान केले गेले.नरेंद्र दाभोळकर,गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या तेव्हा आरोपींना सत्ताधाऱ्यांचे आशीर्वाद होते पण आता तर कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हाती असलेल्या यंत्रणांचा वापर होत आहे असा आरोप यावेळी नारकर यांनी केला.शहिदांना अभिवादन करून व पक्षाचे झेंडावंदन करून या अधिवेशनाला सुरुवात झाली.राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी व कार्यकर्ते या अधिवेशनासाठी आलेले आहेत