नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ मार्च २५ शुक्रवार
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून सदर न्यायाधीशांच्या बंगल्यात बेहिशेबी रोकड आढळून आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने बदलीचा निर्णय घेतला आहे.न्यायाधीश यशवंत वर्मा यांना आता अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांच्या मुळ पोस्टिंगवर पुन्हा पाठविण्यात आले आहे.न्या.यशवंत वर्मा यांनी या प्रकरणावर अद्याप भाष्य केलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागली होती.वर्मा यांचे कुटुंबिय त्यादिवशी घरात नव्हते. त्यांनी फोनवरून अग्निशामक दल आणि पोलिसांना आग लागल्याबाबत माहिती दिली.आग विझवल्यानंतर अग्निशामक दलाला बंगल्यातील काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली.सदर माहिती मिळाल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायवृदांची बैठक बोलावली आणि न्या.यशवंत वर्मा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याचा निर्णय घेतला.ऑक्टोबर २०२१ पर्यंत ते इथे कार्यरत होते तसेच न्या.यशवंत वर्मा यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात महाभियोग कारवाई सुरू करण्यावरही चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून न्या.यशवंत वर्मा यांना राजीनामा देण्यासही सांगितले जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे.
१९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संवैधानिक न्यायालयामधील न्यायाधीशांचा भ्रष्टाचार,गैरव्यवहार आणि न्यायालयीन अनियमिततेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहिर केली होती.न्यायाधीशांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर सर्वात आधी सरन्यायाधीश संबंधित न्यायाधीशांकडून त्यांचे उत्तर मागतात.जर संबंधित न्यायाधीशांचे उत्तर समाधानकारक नसेल आणि चौकशीची आवश्यकता वाटत असेल तर सरन्यायाधीश चौकशी समिती गठीत करू शकतात.या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे दोन मुख्य न्यायाधीश यांचा समावेश असतो.समितीचा अहवाल आल्यानंतर सरन्यायाधीशांना सदर प्रकार गंभीर वाटत असेल तर ते संबंधित न्यायाधीशांना राजीनामा देण्यास सांगू शकतात.जर संबंधित न्यायाधीशांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सरन्यायाधीश संसदेला पत्र लिहून संविधानाच्या अनुच्छेद १२४ (४) नुसार कारवाई करण्यासाठी सांगू शकतात.
घरात नोटांचा ढिगारा,बेहिशेबी रोकड बाळगणारे न्यायाधीश यशवंत वर्मा कोण आहेत ?

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा सध्या चर्चेत आहेत.सर्वोच्च न्यायालयाने त्यांची तडकाफडकी बदली केली असून त्यांना पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.होळीच्या दिवशी वर्मा यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी आग लागली होती.ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा वर्मा यांचे कुटुंबिय घरी नव्हते.आग विझवत असताना एका खोलीत बेहिशेबी रोकड आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली.सदर प्रकरण भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना समजल्यानंतर कारवाईच बडगा उगारण्यात आला आहे.
१४ मार्च रोजी न्या.वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात अचानक आग लागली.यानंतर कुटुंबातील सदस्यांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली.अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.यावेळी एका खोलीत खूप मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आली.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी आग लागली त्यावेळी न्या.वर्मा घरात उपस्थित नव्हते.ही माहिती सर्वोच्च न्यायालय आणि सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे तसेच त्यांना पुन्हा अलाहाबाद न्यायालयात पाठविण्यात आले आहे.न्या. वर्मा यांचा जन्म ६ जानेवारी १९६९ रोजी अलाहाबाद येथे झाला.दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉमची पदवी मिळविली व त्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशच्या रेवा विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले.८ ऑगस्ट १९९२ रोजी त्यांनी वकिली सुरू केली.अलाहाबाद उच्च न्यायालयात १३ ऑक्टोबर २०१४ रोजी न्या. वर्मा यांनी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम करण्यास सुरुवात केली.इथूनच त्यांच्या न्यायमूर्तीच्या कारकिर्दीला सुरूवात झाली.१ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांची कायमची नियुक्ती झाली.त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली होती.