अवघ्या ४ तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन !! जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले व गोळीबार !! सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे भारताकडून निर्देश !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ मे २५ रविवार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ८६ तास चाललेल्या संघर्षानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता शस्त्रसंधीची घोषणा झाली व दोन्ही देशांनी याबद्दलचा निर्णय घेतला मात्र पाकिस्तानने अवघ्या ४ तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने पु्न्हा एकदा गोळीबार सुरु केला आहे.यात पाकिस्तानकडून ड्रोन हल्लेदेखील केले जात असून श्रीनगरमध्ये स्फोटांचे ४ ते ५ आवाज ऐकू आलेले आहेत.सांभा सेक्टरमध्ये सायरन वाजू लागले आहेत.पाकिस्तानी हल्ल्यांना जशास तसे उत्तर देण्याच्या सूचना सीमा सुरक्षा दलाला देण्यात आलेल्या आहेत.
जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात गोळीबार सुरु झाला आहे.शस्त्रसंधीची घोषणा होऊन अवघे ४ तास उलटले आहेत पण पाकिस्तानने पुन्हा एकदा आगळीक केली आहे.काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात संशयास्पद ड्रोनचा स्फोट झाला.अखनूर,राजोरी,आरएसपुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने उखळी तोफांचा वापर सुरु केला असून बारामुलामध्ये ड्रोन हल्ला झालेला आहे.
यात जम्मूच्या पलनवाला सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत.पाकिस्तानने गोळीबार सुरु केल्यानंतर जम्मूतील बहुतांश भागात ब्लॅकआऊट करण्यात आलेला आहे.बारामुलामधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे.श्रीनगरमधील अनेक भागांमध्येही अंधार पसरला आहे.राजस्थानच्या पोखरणमध्येही मोठ्या संख्येने ड्रोन दिसत आहेत.हवाई सुरक्षा यंत्रणा त्यांना नष्ट करत आहे.राजोरीमध्येही गोळीबार सुरु आहे.पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.पाकिस्तानचे ड्रोन्स पाडण्याचे काम हवाई सुरक्षा यंत्रणेकडून केले जात आहे.भारताची एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडत आहे.पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त करून शस्त्रसंधीचे काय झाले असा सवाल त्यांनी विचारला असून श्रीनगरमधील अनेक भागांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचे अब्दुल्ला यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
युद्धविरामानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच !! जम्मूपासून राजस्थानपर्यंत ड्रोन हल्ले !!
नवी दिल्ली :- युद्धविरामानंतरही पाकिस्तानच्या कुरापती काही थांबण्याचे नाव घेत नसून युद्धविरामानंतर अवघ्या ४ तासांत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे आणि आपला खरा रंग दाखवला आहे.जम्मू-काश्मीरपासून राजस्थानपर्यंत पाकिस्तानने ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरु केला.खरेतर पाकिस्ताननेच भारताकडे युद्धबंदीची विनंती केली होती पण आता त्याच पाकिस्तानने सीमावर्ती भागात हल्ले सुरु केले आहेत तेव्हाच भारत मात्र या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहे.युद्धविरामानंतर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये रात्रीची शांतता होती मात्र पाकिस्तानी ड्रोनच्या मोठ्या स्फोटांनी ती भंगली आहे.भारतीय हवाई संरक्षण दलाने हे ड्रोन हल्ले उधळून लावले आहेत परंतु शहरात ब्लॅकआउटची परिस्थिती कायम आहे यावर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की,युद्धविरामाचे काय झाले ? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले.उधमपूरमध्येही असेच एक दृश्य पाहायला मिळाले आहे जिथे भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी ड्रोन हाणून पाडले आहेत.
पाकिस्तानचे हे कृत्य फक्त जम्मू आणि काश्मीरपुरते मर्यादित नाहीत तर पंजाबमधील पठाणकोट आणि फिरोजपूरमध्येही ड्रोन दिसल्याने पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला आहे. राजस्थानातील जैसलमेर आणि बारमेर देखील पूर्णपणे अंधारात बुडाले होते.हे स्पष्ट आहे की,पाकिस्तानचा कट सीमेपलीकडून भारताच्या प्रत्येक कोपऱ्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
गुजरातमधील कच्छमध्येही पाकिस्तानी ड्रोन नजरेस पडले आहेत.गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबद्दल माहिती दिली असून त्यांनी एक्स हँडलवर पोस्ट करत म्हटले की,कच्छ जिल्ह्यात अनेक ड्रोन दिसले आहेत.आता संपूर्ण ब्लॅकआउट लागू केले जाईल.कृपया सुरक्षित रहा,घाबरू नका.
भारतीय लष्कर आणि हवाई संरक्षण दलांनी पाकिस्तानला प्रत्येक आघाडीवर चोख प्रत्युत्त दिले असून श्रीनगर आणि उधमपूरमध्ये ड्रोन पाडण्यात आले आणि सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला पाकिस्तानला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले आहे पण अजूनही असा प्रश्न कायम आहे की,पाकिस्तान कधीतरी आपल्या कारवाया थांबवेल का की भारताला अधिक कठोर पावले उचलावी लागतील ?
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन हे अत्यंत निंदनीय !! सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे परराष्ट्र सचिवांचे निर्देश !!
नवी दिल्ली :- युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून पाकिस्तानने पुन्हा कुरापती सुरु करुन आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे.खरेतर पाकिस्तानने विनंती केल्याने द्विपक्षीय संवादातून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली व आता त्याच पाकिस्तानने सीमावर्ती भागात हल्ले सुरु केले आहेत.यावर आता परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव यांनी या स्थितीबद्दल माहिती दिली असून विक्रम मिस्त्री यांनी सामंजस्य कराराचे उल्लंघन होणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी काल संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये एक सामंजस्य करार झाला.गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या सामंजस्य कराराचे उल्लंघन केले जात आहे.भारतीय सैन्य या सीमेवरील घुसखोरीला प्रत्युत्तर देत आहे आणि त्याचा समर्थपणे सामना करत आहे व ही घुसखोरी अत्यंत निंदनीय आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे.आम्हाला वाटते की पाकिस्तानने ही परिस्थिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी त्वरित योग्य कारवाई करावी असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी नमूद केले आहे.